Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha : आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल, महापुरुषांबाबत सातत्याने अपमानास्पद बोललं जात आहे. राज्याचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. गरळ ओकण्याचे, बेताल वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. यामागे कोण मास्टरमांईड हे शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील नागरिक चुकल्यास दिलगिरी व्यक्त करतो, पण इथं घडताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha) हल्ला चढवला.

  


महाविकास आघाडीकडून आज मुंबईत राज्यपाल हटाव तसेच महापुरुषांविरोधात होणाऱ्या बेताल वक्तव्याविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना अजित पवार यांनी सरकारवर कडाडून प्रहार केला. कोश्यारी हटाव, महाराष्ट्र बचाव! असा नाराही अजित पवारांनी दिला. येत्या हिवाळी अधिवेशानात महापुरुषांच्या अपमानाविरोधात कडक कायदा करावा लागला, तरी चालेल. विरोधी पक्ष त्यांना पाठिंबा देतील, सरकारनेही तसे विधेयक आणावे, असेही ते म्हणाले. 


सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न असताना अचानक भाषा कशी सुरु झाली, याचा विचार जनतेनं केला पाहिजे. एकसंध महाराष्ट्रातील गावे वेगळी भाषा बोलत आहेत, देशात महाराष्ट्र वेगळा आहे, साधू संतांचा वारसा असून सीमाभागातील अन्याय खपवून घेणार नाही. शिंदे सरकारमध्ये महापुरुषांचा अपमान केला जात आहे. बोम्मईंचे ट्विट खोटं असल्याचे सांगतात, कर्नाटक बँकेत खाती उघडण्यास सांगतात, या सरकारला जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात अजित पवारांनी हल्ला चढवला. 


अजित पवार म्हणाले की, ही वेळ का आली? याचा विचार करण्याची गरज आहे. महापुरुषांबाबत सातत्याने अपमानास्पद बोललं जात आहे. राज्याचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. गरळ ओकण्याचे, बेताल वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. यामागे कोण मास्टरमांईड हे शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील नागरिक चुकल्यास दिलगिरी व्यक्त करतो, पण इथं घडताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी. 


अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यपाल हटाव तसेच महापुरुषांच्या अपमानकारक वक्तव्याविरोधात पुणे बंद होते. वेगवेगळी शहरे बंद होत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठेवली पाहिजे, पण आजच्या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल. राज्यपालांना हटवलं पाहिजे. माफी मागितली पाहिजे. 


इतर महत्वाच्या बातम्या