मुंबई : मुंबई आणि परिसरात गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मुंबई शहर भागासह पूर्व व पश्चिम उपनगरांत या दिवशी गोविंदा पथकाचा (Govinda) उत्साह शिगेला पोहचत असतो. गोविंदा पथकांमध्ये उत्साह असताना विविध यंत्रणादेखील सज्ज असतात. मुंबई महापालिकेनेदेखील जोरदार तयारी केली आहे. जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात (BMC Hospitals) व्यवस्था करण्यात आली आहे. 


गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडीच्या (Dahihandi) अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार संभाव्य गरज लक्षात घेऊन महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  


मुंबई महानगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या दहीहंडीच्या (Dahihandi) कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात 10, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात सात रूग्णशय्या (रुग्णांसाठी खाटा) आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 4 रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच 16 उपनगरीय रूग्णालयातही एकूण 105  रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 5 ते 10 खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.


या व्यवस्थे अंतर्गत निर्धारित पद्धतीनुसार किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांवर प्रथमोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात येते. तर, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठीही उपचार सुविधा देण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेने तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
 
त्याचबरोबर महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जीकल मटेरिअल, पीओपी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्स रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांनी या काळात दक्ष रहावे, अशा सूचनाही महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना व आरोग्य यंत्रणेला प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, दहिहंडी निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरात राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :