कल्याण : कल्याणमध्ये गेल्या महिन्याभरात खड्ड्यांमुळे पाचवा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खड्ड्यात बाईक आदळल्यानंतर मागून आलेल्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला.


कल्याणच्या गांधारी पुलाजवळ काल रात्री हा प्रकार घडला. कल्याणजवळच्या गावात राहणारा कल्पेश जाधव बाईकवरुन चालला होता. त्याचवेळी कल्पेशची बाईक खड्ड्यात अडकून पडली.

बाईक खड्ड्यात असतानाच मागून येणार्‍या ट्रकने कल्पेशला धडक दिली. ट्रकखाली चिरडला गेल्यामुळे कल्पेशचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण आणि परिसरात खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाल्याचं वारंवार समोर येत आहे. काहीच दिवसांपूर्वी खड्डा चुकवताना बाईक घसरुन ट्रकखाली आल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

आणखी किती जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार? हा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी कल्याणमधील लोकप्रतिनिधींनी केली आहे.