Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याच्या प्रकल्प सुरू आहे. कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे आणि बारावे प्लांटवर गेल्या वर्षभरात सुमारे दहा हजार मेट्रिक टन खत निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या खताला नाशिक,पुणे आणि सोलापूर येथून मागणी वाढली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्या आणि फळे घेऊन येणाऱ्या टेम्पो मधून खत निर्यात केली जात आहे. 


कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतर्फे कचरा समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याचाच भाग म्हणून आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात ओला आणि सुका कचरा वर्गीकरण मोहीम देखील राबविण्यात येत आहे.


महापालिका क्षेत्रात तयार होणाऱ्या 350 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर कल्याण पश्चिमेकडील बारावे आणि उंबर्डे या प्रकल्पात प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. कचरा ते खत ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांचा कालावधी लागत असून वर्षभरात महापालिकेकडे दहा हजार मेट्रिक टन खत निर्माण झालं आहे. तयार झालेल्या या खताची विक्री करण्याचे परवानगी प्रक्रिया करणाऱ्या ठेकेदाराला देण्यात आली. शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरात चांगल्या दर्जाचे खत उपलब्ध करून दिले जात असून मुंबईसह इतर शहरात सेंद्रिय खत उपलब्ध होत नसल्याने  शेतकऱ्यांकडून देखील या खताची मागणी वाढली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज भाज्या आणि फळभाज्या घेऊन येणाऱ्या टेम्पोमधून देखील जाताना खत नेले जात आहे. सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, बारामती, मंगळवेढा या भागातून असलेली मागणी आता वाढली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने 300 मॅट्रिक टन खताची मागणी नोंदवली असल्याचे केडीएमसी उपयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live