Independence Day 2022:  राज्याला गतिमान प्रशासन आणि विकासाला आणखी चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. पहिल्या दिवसापासून सामान्यांसाठी सरकार झटत आहे. पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे वेगाने सुरू असून मदतीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण (National Flag hoisting at Mantralaya) झाले. महाराष्ट्राला देशात एक अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त देश व राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले


यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मुसळधार पावसामुळे 28 जिल्ह्यांना फटका बसला आहे. 15 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे 15 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. या नागरिकांची सर्व काळजी घेतली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यातून नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांसाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.


धनगर समाज, ओबीसींना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न सरकारचे सुरू आहेत. बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळाले आहे. दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत संस्थेला उभारी देण्यात येत आहेत


नवीन उद्योगांसाठी सरकारचे प्रयत्न


स्टार्टअपसाठी सरकारकडून पाठबळ देण्यात येत आहेत. नवीन उद्योजक तयार होतील याकडे लक्ष देत आहोत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण योजना आणि त्यातून उद्योग उभारणीसाठी सरकारकडून मदत देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  


सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकारसोबत संवाद सुरू असून अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले


आमचे गुरुजी उपक्रम


राज्य सरकार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने 'आमचे गुरुजी' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये वर्गामध्ये शिक्षकाचे छायाचित्र आणि माहिती असणार आहे. यातून विद्यार्थी आणि पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यात कोणतीही शाळा एक शिक्षकी राहणार नसल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. 


समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार. नागपूर-मुंबई दरम्यानचा हा महामार्ग विकासाचा महामार्ग ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या घरासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. संबंधित यंत्रणांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.  जनतेच्या हिताची कामे सुरू असून शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.