मुंबई : "2019 मध्ये भाजपला विजय हवा असेल तर भाजपचे नेतृत्त्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा," अशी मागणी शेतकरी नेते आणि महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. केशव तिवारी यांनी या संदर्भात सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना पत्र पाठवलं आहे.


"मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील निकाल हा भाजपमधील काही अहंकारी नेत्यांचा पराभव आहे. त्यांनी लादलेली नोटाबंदी, जीएसटी कर प्रणाली, इंधनाचे वाढलेले दर हे अहंकारी नेत्यांच्या धोरणामुळेच आहे. भाजपच्या आत आणि बाहेरही या अहंकारी नेत्यांबद्दल तसाच सूर आहे," असं तिवारी यांनी पत्रात लिहिलं आहे.

"जनतेमध्ये संभ्रम असून सर्व स्तरातील जनतेमध्ये विश्वासाचं आणि भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी पक्षातील मवाळ नेते यांच्याकडे नेतृत्त्व देण्याची मागणी गावस्तरावर जोर धरत आहे. सर्व क्षेत्रात विकास करण्यासाठी आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन भाजपला 2019 मध्ये विजय मिळवायचा असल्यास त्यांनी "मवाळ चेहरा" असलेले नेते नितीन गडकरी यांच्याकडे नेतृत्व द्यावं लागेल," अशी मागणी किशोर तिवारी यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

केशव तिवारी यांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, "पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची धुरा नितीन गडकरींच्या हातात दिली असती तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली असती. शिवाय छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये भाजपची दयनीय अवस्था झाली नसती. अतिरेकी भूमिका घेणारे, हुकूमशाहीने पक्षाला आणि सरकारला चालवणारे नेते समाजाला तसंच देशाला घातक सिद्ध होतात हा इतिहास भारताला नवीन नाही. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपने आपलं नेतृत्त्व नितीन गडकरींकडे देऊन डिसेंबर 2012 मध्ये केलेली चूक दुरुस्त करावी."