मुंबई : राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये भगवदगीतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे. उच्च शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

या परिपत्रकानुसार, मुंबई आणि मुंबई उनगरामधील ज्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनामध्ये A/A+ प्राप्त आहेत, अशा 100 महाविद्यालयांमध्ये आता भागवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी 100 भगवदगीतेचे संच संबंधित महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यात आले आहेत.

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये आता भगवदगीतेचं वाटप होणार!


अनेक महाविद्यालयांमध्ये या निर्णयाची चर्चा रंगली आहे. "शैक्षणिक संस्थामध्ये धर्मनिरपेक्षतेचं वातावरण असायला हवं. सरकारला या आदेशावर पुन्हा एकदा विचार करायला हवा," असं विद्यार्थी संघटनांचं मत आहे.

"जर उच्च शिक्षण विभागाने भगवदगीताऐवजी संविधानाचं वाटप केलं असतं तर चांगलं झालं असतं. सरकारने योग्य विचार करुन निर्णय घेतलेला नाही," असं रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष गाडे यांनी म्हटलं आहे.