मुंबई : नागरिकांनी लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले नाही तर, 30 एप्रिल नंतरही लॉकडाऊन वाढवले जाण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्रात जास्त कोरोना चाचणी घेतल्यामुळे देशात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह राज्यात असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील रुग्णालयांची आता तीन विभागात वर्गवारी करण्यात येणार असून त्याप्रमाणे रुग्णालयात व्यवस्था करणार आहे. त्याशिवाय रॅपीड टेस्टनंतर आता पूल टेस्टीगचाही वापर करणार असल्याचं टोपे यांनी सांगितले. राज्यात मुबलक प्रमाणात वैद्यकीय सुरक्षा साहित्याचा साठा आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचं कारण नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्र सरकारने केल्यामुळे राज्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत. या कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. कोणताही कोरोना संशयित यातून सुटता कामा नये, असंही राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी किमान 30 एप्रिल या शब्दावर जोर दिला. म्हणजेच लोकांनी लॉकडाऊन गांभीर्याने घेतले नाही. तर, याचा कालावधी वाढवण्यात येईल, असे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिला.


महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
आतापर्यंत राज्यात 33 हजार कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. यातील एकट्या मुंबईत 19 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकही रुग्ण सुटता कामा नये, हा यामागील उद्देश. हे रुग्ण मुंबई, एमएमआर (MMR) आणि उपनगर या भागात 91% रुग्ण. यात 61% मुंबईत तर 20% पुण्यात आहेत. तर उर्वरित 10% एमएम आर (MMR) मध्ये आहे. ह्या तीन भागत सोडून उर्वरित राज्यात केवळा 9 टक्के कोरोना बाधित आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यात रुग्णालयाचे तीन भागात वर्गीकरण
1) फक्त लक्षण नसलेले कोविड रुग्ण
2) कमी लक्षण असलेले कोविड रुग्ण
3) ह्यात गंभीर कोविड रुग्ण. यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. केंद्राने साधने उपलब्ध करुन द्यावी, असा आग्रह केंद्राकडे धरल्याचंही टोपे यांनी सांगितले. यात पीपीई किट आणि मास्क मुबलक प्रमाणात देण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ज्या गोष्टी लागतील ते राज्यसरकार खरेदी करणार असल्याचंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
सर्वांनी आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करण्याचंही आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. खासगी रुग्णालय सुरू होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पूल टेस्टिंग संकल्पना राज्याच्या वतीने मांडली. अमेरिकेतील महाराष्ट्राचे डॉक्टरांनी त्यांचा अभ्यास करून मांडला. त्यांनी आपल्या राज्याला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. यात सोसायटी किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची चाचणी घ्यायची पॉझिटिव्ह आली तर सर्वांचीच चाचणी करण्यात येईल. यामुळे कोरोना चाचणी घेण्याचा वेळ कमी होईल. संपूर्ण देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन राहणार आहेत. त्यानुसार जिल्हाबंदी करुन अंतर्गत काही करता येईल का? यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यात 15 केस म्हणजे रेड झोन, 15 पेक्षा कमी केस असल्यास ऑरेंज आणि ग्रीन म्हणजे एकही केस नाही. याबाबत गाईडलाईन एक दोन दिवसात सांगितली जाण्याची शक्यता आहे. ज्या कंपन्या कामगारांची सुरक्षेची काळजी घेऊन त्यांची कंपनीत राहण्याची सोय करेल, अशा कंपन्यांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात असल्याचंही टोपे म्हणाले. मात्र, यासाठी नियम व अटी बनवण्यात येणार आहेत. कोणालाही कोरोनासदृष्य लक्षणे असल्यास त्यांनी स्वतःहून पुढे यावे, असं आवाहनही टोपे यांनी केलं.

Lockdown extend in Maharashtra | महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे