Girish Mahajan at Badlapur : बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकांवर आंदोलकांनी रुद्रावरतार धारण केलाय. आंदोलकांकडून आरोपींना 'फाशी द्या'च्या घोषणा सुरुच आहेत. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आंदोलकांकडून त्यांच्यावर बाटली फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अजूनही बदलापूरमधील जमाव पांगवण्यात पोलिसांना अपयश आलंय. 


पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय


बदलापूर रेल्वे स्थानकात परिस्थिती जैसे थे आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी रेल्वे स्थानकांवर जमण्यास सुरुवात केली होती. अद्याप आंदोलक मागे हटलेले नाहीत. पोलिसांसह सर्व यंत्रणा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,मात्र आंदोलक हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 


एकनाथ शिंदे यांची पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा


बदलापूर मधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. बदलापूर येथील प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे. अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला असून सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


अक्षम्य गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची जराही हयगय केली जाणार नाही : अजित पवार 


अजित पवार म्हणाले, बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आणि अत्यंत संतापजनक आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या घटनेचा बारकाईने तपास केला जाईल. त्यासाठी आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. हा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची जराही हयगय केली जाणार नाही. त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी जलद गतीने व्हावी, याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या लेकींना न्याय मिळालाच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Kisan Kathore on Badlapur Case : आंदोलक बदलापूरचे रहिवासी नाहीत, ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी; भाजप आमदाराचा दावा