26/11 Mumbai Terrorist Attack : मुंबईमध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला कोणीही विसरु शकणार नाही. पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत नरसंहार माजवला होता. यामध्ये जवळपास दोनशे लोकांचा मृत्यू झाला. जर मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला अटक केली नसती तर या हल्ल्याची उकल कधीच झाली नसती. परंतु कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिसांच्या टीमसोबत जे काही वर्तन होत आहे ते अतिशय लांच्छनास्पद आहे. महाराष्ट्र सरकारने या पोलीस टीमला प्रमोशनचं आश्वासन दिलं होतं, ते अद्यापही पूर्ण झालं नाही. 


मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या हत्येनंतर कसाब आणि त्याच्या दहशतवादी गटाने एक स्कोडा कार हायजॅक केली. ती कार मलबार हिलच्या दिशेने जात होती. या कारला थांबवण्यासाठी डीबी मार्ग पोलिसांच्या एका टीमने गिरगाव चौपाटीवर नाकेबंदी केली. ज्यावेळी ती कार त्या ठिकाणी पोहोचली त्यावेळी त्या कारला थांबण्याचे आदेश देण्यात आले. त्यावर कसाबने आपल्या एके 47 रायफलने पोलिसांवर फायरिंग सुरु केली. या फायरिंगमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे शहीद झाले आणि पोलीस निरीक्षक संजय गोविळकर जखमी झाले. पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इस्माईल या दहशतवाद्याला ठार केलं आणि कसाबला जिवंत पकडलं. 
 
अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत सापडला होता. इतर आठ दहशतवाद्यांना एनएसजीच्या कमांडोंनी ठार केलं. कसाबची चौकशी केल्यानंतर ते सर्व दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं स्पष्ट झालं. या दहशतवाद्यांना कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं होतं, त्यांचं काय नियोजन होतं हे सर्व समोर आलं. 


या घटनेनंतर तब्बल 12 वर्षांनी, 2020 साली या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी या सर्व टीमला वन स्टेप प्रमोशन देण्याचं जाहीर केलं. याचा अर्थ हे पोलीस ज्या पदावर आहेत त्यांना एक पद वरती थेट प्रमोशन देण्यात येणार. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोविळकर, हेमंत बावधनकर आणि भास्कर कदम यांना थेट एसीपी या पदावर पदोन्नती मिळणार होती. 


गृहमंत्र्यांच्या या घोषणेचे सर्वांनी स्वागत केलं.आज ही घोषणा होऊन दीड वर्षांहून जास्त कालावधी झाला आहे.  परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही. या पोलीसांची थट्टा केल्यासारखं त्यांच्याशी वर्तन करण्यात आलं आहे. यापैकी कोणत्याही अधिकाऱ्याचं प्रमोशन झालं नाही. यातील अनेकजण आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इस्माईल या दहशतवाद्याला मारणारे हेमंत बावधनकर या वर्षाच्या डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.


या बहादूर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत जे काही ते अत्यंत वाईट आहे. सरकार आपले आश्वासन विसरले की या पोलिसांची थट्टा केली. आता जी काही शेवटची आशा राहिली आहे ती सध्याच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून. उशिराने का असेना ते हे आश्वासन पाळू शकतात. 


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha