ठाणे:  आजपासून हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु हा निर्णय केवळ फाईव्ह स्टार हॉटेलच्या फायद्याचा आहे. छोट्या हॉटेल व्यवसायिकांच्या फायद्याचा नाही, अशी भूमिका ठाणे ओनर असोसिएशनच्या सदस्यांनी मांडली आहे. सध्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेररिल हॉटेल, लॉज यांना अंतरनियम पालन आणि क्षमतेच्या 33 टक्के क्षेत्राच्या वापराची अट घालून परवानगी देण्यात आली आहे. परंतु ज्या हॉटेल आणि लॉज व्यवसायिकांचे केवळ 10 ते 15 रूमचे लॉज किंवा हॉटेल आहेत. त्यांचं काय? सध्याच्या नियमानुसार त्यांचे केवळ दोन नाहीतर 3 रूम्स सुरू करण्यास परवानगी असेल. यासोबतच जे व्यवसायिक भाड्याने हॉटेल व्यवसाय चालवतात त्यांना तर मागील तीन महिन्याचे भाडे, लाईट बील द्यायला पैसे नाहीत तर मग ते हा व्यवसाय पुन्हा कसा सुरू करणार असा सवाल संघटनेचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.


शिवाय सध्या उपहारगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, तेव्हा हॉटेलमध्ये ग्राहक तरी कसे येणार? असं देखील शेट्टी यांनी म्हंटल आहे. सध्या मुंबईत असणारी हॉटेल व्यवसायिकांची ' आहार' ही संघटना या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याचं देखील शेट्टी म्हणाले.

गेले तीन महिने हॉटेल, उपहारगृह बंद आहेत. परिणामी त्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. यासोबतच हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायिकांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती.

रेस्टॉरंट्स आणि डायनिंग हॉल्सबाबत आठवडाभरात निर्णय?

उपहारगृहे आणि मोठ्या हॉटेलांमधे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे शक्य होईल. या दृष्टीने कार्यपद्धती तयार करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर लगेचच सरकारने निवासाची व्यवस्था असलेली हॉटेल, गेस्ट हाऊस तसेच लॉज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाबाबत हॉटेल व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हॉटेल व्यवसायिक प्रशांत शेट्टी म्हणाले की, सध्या असे अनेक हॉटेल व्यवसायिक आहेत. जे भाड्याने हॉटेल चालवायला घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. मागील साडे तीन ते चार महिन्यांपूर्वी लॉकडाऊन जाहिर झालं आणि या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला. त्यानंतर आता परवानगी देण्यात आली आहे. परंतु यामध्ये छोट्या व्यवसायिकांचा विचार केला नसल्याचं दिसत आहे. 33 टक्क्यांच्या नियमानुसार आमचे व्यवसाय सुरू होणं अशक्य आहे. अगोदरच हॉटेलचे भाडे, बँकेचे हफ्ते, प्रॉपर्टी टँक्स थकलेले आहेत. त्यामुळे आता व्यवसाय सुरू करून देखील उपयोग नाही. त्यामुळे शासनाने 100 टक्के व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी.