Cyrus Mistry: प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन झालं आहे. पालघर येथे त्यांच्या कारचा अपघातात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पालघर जिल्हा अधीक्षकांनी दिली. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.



देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, 'प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति ! पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.'


 







कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या जाण्याने हानी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'


दरम्यान, आज दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. यातच आता इतके मोठे उद्योगपती असूनही अहमदाबाद ते मुंबई 523 किमीचा प्रवास रस्त्याने का करत होते. त्यांच्याकडे स्वतःचे खासगी विमान असूनही त्यांनी रस्त्याने प्रवास करायचा निर्णय का घेतला असावा, हे आणि असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत.