Cyrus Mistry Death in Car Accident : टाटा उद्योग (Tata Sons) समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं पालघरमध्ये (Palghar) अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 


दरम्यान मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले आहेत. अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना पालघरच्या चारोटीजवळ मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. दुभाजकाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अतिवेगानं गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनं केला आहे. दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे. 


मुंबईतील जे. जे. रुग्णालयात सायरस मिस्त्रींच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम 


उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे रूग्णालयात आणण्यात आलं होतं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या या अपघातात गाडी चालक आणि सायरस मिस्त्री या दोघांचं पार्थिव शनिवारी रात्री मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम रात्री अडीच वाजता पार पडलं. त्यानंतर त्यांचं पार्थिव जे. जे रुग्णालयात ठेवण्यात आलं. सायरस मिस्त्री यांचे भाऊ आणि मुलं काल रात्री मुंबईत आल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 


नेमका कसा झाला अपघात? 


54 वर्षी सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. परवा (रविवारी) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्री यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झाला. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


54 वर्षीय सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारमधून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात त्यांची कार डिव्हायडरला आदळली, तेव्हा हा अपघात झाला. कारमध्ये 4 लोक होते, ज्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. महिला कार चालवत होती, सध्या ती जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिस्त्री यांच्याशिवाय जहांगीर दिनशा पंडोल नावाच्या व्यक्तीचाही अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अनायता पांडोळे (महिला चालक) आणि दारियस पांडोळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.