मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आहे. यामुळे नागरिकांना फक्त किराणा माल, दूध, भाजी, इतर अत्यावश्यक वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ (अन्न-पाणी), औषधे यांची खरेदी करता येणार असून इतर वस्तू विकणाऱ्या दुकानांची परवानगी रद्द करण्यात आल्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले होते. मात्र, या निर्देशात बदल करुन आता मुंबई महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.


कारण, जीवरक्षक वैद्यकिय उपकरणे, वैद्यकिय सुविधांसाठी आवश्यक आयटी सिस्टीम यांच्या बिघाडानंतर त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक, हार्डवेअरची दुकाने बंद असल्यानं त्यात अडचणी येत आहेत. म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये तिथल्या सहाय्यक आयुक्तांना एका रस्त्यावरील एकच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान खुले ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.

3 मेनंतर मुंबई रेड झोनमध्ये असूनही लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार काही अटींसह दुकाने आणि वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, वाईन शॉपच्या बाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तातडीने पुन्हा लॉकडाऊनच्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. प्रवीण परदेशी यांनी 5 मे रोजी परिपत्रक काढून मद्य आणि अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर मुंबईचे आयुक्त परदेशी यांनी परिपत्रकात सुधार करुन नवीन परिपत्रक काढले आहे. आता अत्यावश्यक सेवेसोबतच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकांनाना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.



बीएमसीच्या इतर दुकाने बंद करण्याच्या निर्णयाचा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोशिएशनकडून विरोध करण्यात आला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहून इतर दुकाने सुरु करण्याला परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली आहे. असोशिएशनचे अध्यक्ष वीरेश शाह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, 50 दिवसांच्या लॉकडाऊननंतर लोकांना घरगुती वापरांच्या वस्तुंची गरज भासू लागली आहे. शॉर्ट्स, नाईटवेअर , अंडरगारमेंट्स,टीशर्ट , ट्रॅक पॅन्ट्स आणि अन्य कपड्यांची गरज नागरिकांना आहे. गृहिणींना भांडी, बर्नर, टोस्टर, व्हॅक्यूम क्लिनर, रोटी मेकर, जूसर, मिक्सर आणि गृहउपयोगी वस्तूंसह लहान बाळांशी संबंधित उत्पादनांची आवश्यकता आहे. ही सर्व उत्पादने ‘आवश्यक उत्पादन’ म्हणून जोडा आणि आम्हाला सर्व मुंबईकरांना सेवा देण्यास परवानगी द्या. कारण या उत्पादनांना मोठी मागणी असलेली शेकडो दुकाने आहेत, असं पत्रात म्हटलं होतं.