मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्णांसोबत दुजाभाव करु नये. हा आजार 100 टक्के बरा होणारा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत माणुसकीला धरुन नसलेली वर्तणूक करु नये, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना व्हायरसच्या सद्यपरिस्थितीची माहिती दिली. राज्यातील 800 चाचण्यांपैकी 42 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच लक्षणं आणि ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्या लोकांचीच तपासणी केली जाणार आहे, असंही ते म्हणाले.


मुंबईत कोरोनाबाधित कुटुंब राहत असलेली सोसायटीच बहिष्कृत केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. घाटकोपरमध्ये एका इमारतीमधील कुटुंबात कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. यानंतर आजूबाजूच्या सोसायटींनी या सोसायटीवर बहिष्कार घातला. याविषयी राजेश टोपे यांना विचारलं असता, त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयितांसोबतचा दुजाभाव ही निषेधार्ह गोष्ट असल्याचं म्हटलं.

मुंबईत कोरोनाबाधित कुटुंब राहत असलेली सोसायटी बहिष्कृत

कोरोना हा आजार 100 टक्के बरा होणारा : राजेश टोपे
राजेश टोपे म्हणाले की, "ज्या ज्या सोसायटीत किंवा घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण किंवा संशयित रुग्ण असतील तर त्यांच्यासोबत दुजाभाव केला जाऊ नये. त्यांच्यासोबत माणुसकीला धरुन नसलेली वर्तणूक करु नये. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे. हा आजार 100 टक्के बरा होणारा आहे. भयभीत होण्याची परिस्थिती नसते. त्यांना विलग राहण्यासाठी सोसायटी आणि घरातील लोकांनी मदत केली पाहिजे. 14 दिवसांच्या देखरेखीनंतर जर त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या तर चिंता करण्याचा विषय नसतो. जर पॉझिटिव्ह आल्या तरी त्याच्यावर उपचार केले जातात. यातून बरं होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. चीनमध्येही बरे झालेल्या रुग्णांचे मोठे आकडे समोर येत आहेत. रोगप्रतिकारशक्ती या व्हायरसवर मात करतेच आणि आपण त्यातून बाहेर पडतोच. त्यासाठी आपल्याला काही शिस्त किंवा गोष्टी पाळाव्याच लागतात. लक्षणावर आधारित उपचार घ्यावेच लागतात. तो पसरु याची काळजी घ्यावी लागते. आपण समाजाचे देणेकरी म्हणून समाजाची काळजी घेणं, जनतेची काळजी घेणं, एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य आहे."

Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 18; राज्यात एकूण 42 कोरोनाग्रस्त

एनआयव्हीला भेट देणार : राजेश टोपे
राज्यात सध्या कोरोनाचे 42 रुग्ण असून उपचार घेणाऱ्या प्रत्येकाची प्रकृती ठीक आहे. गंभीर कोणीही नाही. 800 जणांची तपासणी केली, त्यापैकी 42 जण वगळता उर्वरित सगळ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काही जणांची तपासणी होणं शिल्लक आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की, तपासणीच्या सुविधा वाढवण्याचं काम करत आहोत. त्यासाठी केईएम, हाफकीन आणि जेजे रुग्णालयात ही सुविधा सुरु होईल. औरंगाबाद, धुळे, मिरज, सोलापूर इथे वैद्यकीय महाविद्यालयांची जी रुग्णालयं आहेत तिथे प्रयोगशाळा सुरु करायच्या आहेत, त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आणि एनआयव्हीचं प्रमाणीकरण लवकर कसं मिळेल यासाठी एनआयव्हीला स्वत: भेट देणार आहे.

Rajesh Tope Press on Coronavirus | कोरोना व्हायरसचे सँपल तपासण्यासाठी राज्यात नव्या लॅब उभारणार : राजेश टोपे