मुंबई : ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या कोरोना विरोधातील लशीच्या मानवी चाचण्या ज्या तात्पुरत्या वेळेकरता थांबवल्या होत्या, त्या सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. आज, बुधवारपासून महापालिकेच्या KEM रुग्णालयात ट्रायलमध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची पात्रता तपासण्याच्या कामास सुरुवात होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या एथिकल समितीची परवानगी मिळाली आहे. या ट्रायलमध्ये 100 स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. वास्तवात ही लस शरीरावर टोचण्याकरता पुढच्या आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.


काही दिवसापूर्वी या या चाचण्यांमध्ये लंडन येथील मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या एका व्यक्तीला त्रास जाणवू झाल्याने या चाचण्या काही काळापुरता थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा भारतातील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी उत्पादन करण्याकरता करार झाला आहे. त्यामुळे भारतातील या लसीच्या मानवी चाचण्या महाराष्ट्रात काही रुग्णालयात करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुबंईत, महापालिकेच्या अखत्यारीतील नायर आणि केईएम रुग्णालयात या चाचण्या करण्यात येणार आहे.


अ‍ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटिश बायोफार्मासुटिकल्स कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधन केले आहे. या लसीच्या पहिला आणि दुसरा मानवी चाचण्यांचा टप्पा पार पडला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली होती, मात्र ही लस घेतलेल्या व्यक्तीस या लसीचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने त्यांनी चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला होता.


याबाबत बोलताना केईएम रुग्णलायचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले कि, "या लशीच्या मानवी चाचण्या सुरु आमच्या महापालिकेच्या रुग्णालयात सुरु करणार होतो. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे मानवी चाचण्या थांबविल्या होत्या. मात्र आम्ही त्याची लवकरच सुरुवात करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आमच्याकडे ज्या स्वयंसेवकांनी नोंद केली आहे, त्यांची पात्रता तपासण्यात येणार आहे. त्या काही चाचण्या आम्ही करू. आतापर्यंत आमच्याकडे अंदाजे 375 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी या मानवी चाचणीत सहभागी होण्याविषयी उत्सुकता दाखवली आहे. त्याप्रमाणे आम्ही त्या सर्वांना कॉल करून बोलावू आणि आमची जी काही शास्त्रीय प्रक्रिया पार पाडू. शरीरावर लस टोचणी करीत पुढचा आठवडा उजाडू शकतो लवकर झालं तर लवकरही करण्याचा प्रयत्न करू."


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याकरिता देशातील 10 संस्थांची निवड केली असून याकरता 1600 निरोगी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. भारतातील 10 संस्थांपैकी मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. प्रत्येकी केंद्रावर 100 निरोगी स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. या स्वयंसेवकात 20 ते 50 वयोगटातील नागरिकांची निवड करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर अनेक परदेशी औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी लस काढत असल्याचे दावे केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात काही कंपन्यांनी काम सुरु केले असून पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांचे निकाल विज्ञान जगतासमोर ठेवले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचण्यांच्या टप्प्याचे काही कंपन्यांचे कामही सुरु झाले आहे.