मुंबई : बहुप्रतिक्षीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 जून) होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (15 जून) नीती आयोगाच्या बैठीकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि नितीन गडकरींची भेट घेणार आहे. पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला तर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.


येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. रविवारी शपथविधी घेऊन नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतील. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत नवीन मंत्रिमंडळ जाहीर केलं जाईल.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याचं बोललं जात असतानाच आता हा विस्तार लांबणीवर पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात नेत्यांना प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह सुरु झाल्याचं बोललं जातं आहे.

विखे पाटलांना कृषी खातं?
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमधून भाजपात आलेल्या राधाकृष्ण विखेंना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याची अपेक्षा आहे. पण भाजप त्यांना कृषी खातं देण्यावर आग्रही आहे.

तर विजयसिंह मोहिते पाटलांना कुठलं खातं द्यायचं यावर अजूनही खल सुरु आहे.

इतकंच नाही तर मंत्रिमंडळात दोन नंबरचे मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यपद देण्याबाबत पक्षात विचार सुरु आहे. पण महत्त्वाची खाती सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्कम जबाबदारी स्वीकारण्यास पाटील अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिवसेनेत अंतर्गत कलह?
एकट्या भाजपातच नाही, तर मातोश्रीच्या आदेश मानणाऱ्या शिवसेनेतही अंतर्गत कलह सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केल्याचं दिसतं. तसंच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं आहे

उपमुख्यमंत्रिपदाबाबत बोलणं योग्य नाही : सुभाष देसाई
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मिळणाऱ्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत बोलणं योग्य नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे. तसंच शिवसेनेत गटबाजी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.