मुंबई : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून जवळच्या इमारतींवर हातोडा पडणार आहे. यात एअरपोर्ट फनेलमध्ये येणाऱ्या 400 हून अधिक इमारतींचा समावेश आहे. हायकोर्टानं आदेश दिल्यानंतरही परिसरात आजही बेकायदेशीर इमारतींचं बाधकाम सुरु असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.


एअरपोर्टवरील धावपट्टीपासून 4 किलोमीटरच्या परिघातील टोलेजंग इमारतींची उंची मोजण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं सप्टेंबर 2016 मध्ये दिले होते. या इमारतींवरील पोल्स आणि एँटिना निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंच असतील तर ते तात्काळ पाडण्यात यावेत असं कोर्टानं सांगितलं होतं. त्यासाठी या परिघातील 112 धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मुंबई विमानतळाजवळील टोलेजंग इमारतींची उंची मोजा : हायकोर्ट


मुंबई विमानतळाच्या जवळ असलेल्या इमारतींवर कारवाईसाठी अड. यशवंत शेणॉय यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. निर्धारीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींवर कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. उंचीनं मोठ्या असणाऱ्या इमारतींमध्ये या परिसरातील काही मॉल्स आणि अनेक उच्चभ्रू तसंच मध्यम वर्गीय लोकवस्ती असलेल्या इमारतींचा समावेश आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर एअर पोर्ट कंपाऊंडला लागून असलेल्या एका सुलभ शौचालयाचाही यात समावेश आहे.

मुंबई विमानतळाजवळची ‘ती’ इमारत तोडा, हायकोर्टाचे आदेश

हायकोर्टाच्या या आदेशाविरोधात दाद मागण्याचा अधिकार या इमारतीतील रहिवाश्यांना नक्कीच आहे. मात्र या इमारतींमुळे एकंदरीत मुंबईची सुरक्षा धोक्यात येणार असेल तर प्रशासन इतर बेकायदेशीर बांधकामांप्रमाणे यांनाही संरक्षण देणार का? आणि लाखो मुंबईकरांवर भितीची टांगती तलवार लटकवत ठेवणार का? असा सवालही विचारण्यात येत आहे.