मुंबई : राज्यात आता लहान मुलांच्या वयोगटासाठी लसीकरणाची सुरुवात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेनेही तीन लाख मुलांच्या लसीकरणाची तयारी केली असून राज्य सरकार आणि कोविड टास्क फोर्सची सूचना येताच या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 


राज्यात आता शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात येत असून त्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. पण शाळा सुरु करण्यापूर्वी या मुलांचे लसीकरण करण्यात यावं यासाठी कोविड टास्क फोर्स आग्रही आहे. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन टप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्यासंबंधी राज्य सरकारच्या सूचना येण्याची शक्यता आहे. 


मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरता मुंबई महापालिकेनं तयारी दर्शवली आहे. तसं राज्य सरकारलाही कळवण्यात आलं आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं राज्य सरकारला कळवलं आहे. 


राज्यातील कोरोना अनलॉकनंतर सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील  कोविड केसेस नगण्य असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे बगीचे, क्रिडांगणे ,बाजार  याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असतांना शाळा सुरु करण्यास हरकत नाही असे महापालिकेचे मत आहे.


टास्क फोर्स काय म्हणतं? 
राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करावं आणि मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे. अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने  दिलाय.


संबंधित बातम्या :