मुंबई: "पालघर पोटनिवडणुकीत आमची ताकद दाखवल्याने अनेकांना धडकी भरली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाहांना चार वर्षानंतर ‘मातोश्री’वर का यावंस वाटतंय? याचा विचार करावा. ही परिस्थिती दुर्दैवी आहे. मात्र शिवसेना ‘एकला चलो रे’ची भूमिका बदलेल असं मला वाटत नाही", अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्या म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ‘मातोश्री’वर ही भेट होणार आहे.

या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

राऊत म्हणाले, “पालघरमध्ये आम्ही निवडणूक लढवून दाखवली. आमचा निसटता पराभव झाला असेल. पण आमची मतं पाहून  अनेकांना धडकी भरली आहे. जिथे निवडणूक कधी लढवली नव्हती, तिथे लाख लाख मतं मिळाली”

एनडीएमधील मित्रपक्ष एकापाठोपाठ सोडून जात आहेत. देशातील राजकारण बदलत आहे. भाजपविरोधात रोष आहे. त्यामुळे त्यांना (भाजपला) वाटत असेल, सगळ्यांना भेटून मोट बांधावी, त्यामुळे हे भेट होत असावी”

सेना भूमिका बदलणार नाही?

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. शिवसेनेने ही भूमिका विचारपूर्वक घेतलेली आहे. जनमताचा कानोसा घेऊन ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे या भूमिकेत बदल होईल असं वाटत नाही” असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

संबंधित बातमी 

अमित शाह 'मातोश्री'वर जाणार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार