मुंबई : शहरातील लोकमान्य टिळक रुग्णालयात कोविड मृतदेहांसोबत रुग्णांना उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करण्यात यावी. तसेच कोविड व्यतिरिक्त अन्य रुग्णांना खाटा, रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याशिवाय टाळेबंदीची काही भागात काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांची अथवा केंद्रीय पथकाची अतिरिक्त फौज तैनात करावी. टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकरी आणि रोजंदारी मजुरांना तातडीचे आर्थिक पॅकेज जाहीर करा, अशा मागण्या करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.



या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली. तेव्हा, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात कोविडच्या मृतदेहाशेजारी रुग्णांना उपचार केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांसह दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि दोन अन्य व्यक्ती अशी विशेष समिती गठीत करुन चौकशी करावी, अशी मागणीही शेलार यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्याची दखल घेत राज्य सरकार आणि पालिका प्रशासन यांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.


पुढील दोनतीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल; CSRI चे डॉ. शेखर मांडे यांची माहिती


दरम्यान टाळेबंदीमध्ये राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा यासाठी ई-लर्निंगसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश राज्य शिक्षण विभागाला देण्यात यावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली होती. मात्र, हा वेगळा विषय असल्यानं त्यावर स्वतंत्र याचिका करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना यावेळी देण्यात आली.



राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 80 हजाराच्या जवळ
राज्यात आज 1352 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 33 हजार 681 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाचे नवीन 2933 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 77 हजार 793 इतका झाला आहे. पैकी सध्या 41 हजार 393 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


Corona Updates | राज्यात आज 1352 रुग्ण कोरोनामुक्त, 123 जणांचा मृत्यू तर 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू