मुंबई : संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढला आहे. त्याच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करतोय, त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय, अशी गंभीर टीका भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांच्या खानदान, वंशजांबद्दल काही वेडंवाकडं बोलला तर जीभ जागेवर राहणार नाही याद राखा, हा इशारा आम्ही आज देतोय, असंही राणे म्हणाले. नारायण राणे आज भाजप कार्यलयात आले असता ते  'माझा'शी बोलत होते.


वादग्रस्त पुस्तक आणि अंडरवर्लड डॉन दाऊद इब्राहिम याच्या विषयी खासदार संजय राऊत यांनी काही वादग्रस्त विधानं केली होती. या विधानांवरुन भाजप नेते नारायण राणे यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे. "छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांच्या खानदान, वंशजांबद्दल काही वेडंवाकडं बोलला तर जीभ जागेवर राहणार नाही याद राखा, हा इशारा आम्ही आज देतोय", असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

भावाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राऊतांची वक्तव्ये : राणे
ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात संजय राऊत यांच्या भावाच्या समावेशावरुन देखील राणे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. "संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढलाय, त्याच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही, तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करतोय, त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय", अशी टीका राणे यांनी केली.

इंदिरा गांधी यांच्याबद्दलचं वक्तव्य लोक विसरणार नाही : राणे
संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही राणे यांनी टीका केली. दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल राऊतांनी माघार घेतलं असलं तरी लोक ते विसरणार आहेत का? अशा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्या मनात नेमकं काय आहे हे स्पष्ट करावं. जर पुन्हा असं धाडस केलं तर खपवून घेणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.

उद्धव ठाकरे यावर का बोलत नाही? : राणे
संजय राऊत जे बोलेल त्याची नैतिक जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे. संजय राऊत जे बोलतात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला सांगतात का? यावर उद्धव ठाकरे का प्रतिक्रिया देत नाहीत? असे प्रश्नही राणे यांनी उपस्थित केलेत. यापुढे जे घडेल त्याला सरकार जबाबदार राहणार आहे. संजय राऊत म्हणाले, की मी दाऊदशी बोलायचो आणि नंतर म्हणाले की दाऊदला दमही दिला. संजय राऊत यांच्या व्यक्तव्याबद्दल गृह विभागाने त्यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

हे आठवडी बाजार सरकार आहे : राणे
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवही जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि सरकार अस्तित्वात आलं असं म्हणतात, पण अजून मलातरी ते जाणवत नाही. कर्जमाफीच्या जीआरमध्ये तारीख नाही, खर्चाची माहिती नाही, लाभार्थ्यांची माहिती नाही. कर्जमाफी निर्णय नाही फकीर घोषणा असल्याचे राणे म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला नाही. त्याअगोदरच पुतळ्याची उंची वाढवण्याची घोषणा होत आहे. आठवडी बाजारानुसार आठवड्याला मंत्री येतात आणि रात्री निघून जातात, असं म्हणत हे आठवडी बाजार सरकार असल्याचे टीका राणेंनी केली. या सरकारने एकही लोकहिताचा निर्णय अद्याप घेतला नाही. मुख्यमंत्री नेमकं कोण? असा प्रश्न उपस्थित करत राणे यांनी आज महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

संबंधित बातमी :

Sanjay Raut | काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबद्दल वक्तव्य मागे | ABP Majha