मुंबई : दिल्लीत (Delhi Farmers Protest) सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच मंगळवारी एक वेगळं वळण मिळालं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये एकच हिंसा उसळली आणि पोलीस, सुरक्षा यंत्रणांशी शेतकऱ्यांचा संघर्ष पाहून सारा देश हादरला. याच मुद्द्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना उद्देशून काही प्रश्नही केले.


महाविकासआघाडीवर निशाणा साधत शेलार म्हणाले, दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही. 'महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं…?', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.


Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम- शरद पवार


वचवच करणारे संजय राऊत दिल्ली घटनेवर का बोलले नाहीत?


रोज वचवच करणारे संजय राऊत दिल्ली आंदोलन हिंसाचाराच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं, मग देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलला नाहीत?, अशा शब्दांत शेलारांनी राऊतांवर निशाणा साधला.


शरद पवारांनी फेसबुक पोस्ट का केली नाही?


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत शेतकरी आंदोलनासंदर्भत केंद्राला गंभीर इशाराही दिला. शिवाय आपण या घटनेचं समर्थन करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण, शेलारांनी त्यांच्या भूमिकेवरही नाराजीचाच सूर आळवला.


'कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार. दिल्ली आंदोलनातील हिंसाचाराच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही? पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट देशाचे जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही? आंदोलनात जो वाद पहिल्यापासून सुरु आहे त्याचं समर्थन शरद पवार, संजय राऊत यांनी केलं. मग हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली? असे प्रश्न शेलारांनी उपस्थित केले. सोबतच सदर प्रकरणी चौकशी होणं अतिशय गरजेचं असून, षडयंत्र रचणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे यासाठी ते आग्रही असल्याचं पाहायला मिळालं.