Mumbai Auto Rickshaw and Taxi Fare Hike : आजपासून मुंबईकरांचा (Mumbaikar) प्रवास महागणार असून मुंबईत रिक्षा (Rickshaw) आणि टॅक्सीची (Taxi) भाडेवाढ होणार आहे. राज्य सरकार आणि रिक्षा टॅक्सी युनियनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं दिलेल्या मंजुरीनुसार, रिक्षासाठी आता 23 रुपये तर टॅक्सीसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी युनियननं संप मागे घेतल्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी अडचण थांबली असली तरी मुंबईकरांचा प्रवास मात्र महागला आहे.  


आजपासून मुंबईत (Mumbai News) टॅक्सीचे भाडं 3 रुपयांनी तर ऑटोरिक्षाचं भाडं 2 रुपयांनी वाढणार आहे. म्हणजेच, मुंबई आणि महानगर भागातील लोकांना आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीनं प्रवास करण्यासाठी किमान 28 रुपये आणि ऑटोरिक्षाने प्रवास करण्यासाठी 23 रुपये मोजावे लागणार आहेत. आजपासून नवीन भाडे लागू होणार आहे. दरम्यान, ऑटो आणि टॅक्सीचं भाडं वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नव्हतं.


टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ


नवीन शुल्कानुसार, दीड किलोमीटर अंतरासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं आता 25 ऐवजी 28 रुपये असेल, तर त्याच अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं आता 21 ऐवजी 23 रुपये असेल. किमान दीड किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सीनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 16.93 रुपयांऐवजी 18.66 रुपये प्रति किलोमीटर भाडं द्यावं लागेल.


ऑटोरिक्षानं प्रवास करण्यासाठी 14.20 रुपयांऐवजी 15.33 रुपये प्रति किलोमीटर भाडं असेल. मुंबई महानगर प्रदेशात, 60 हजार टॅक्सी आणि सुमारे 4.6 लाख ऑटोरिक्षा 1 मार्च 2021 रोजी निर्धारित दरानुसार भाडं आकारत आहेत.


मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचं म्हणणं काय? 


मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने (MMRTA) सांगितले की, पेट्रोल आणि सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सींवर नवीन दर लागू होणार आहेत. 1 मार्च 2021 रोजी सीएनजी गॅसची किंमत 49 रुपये प्रति किलो होती, जी आता 8011 रुपये प्रति किलो झाली आहे. याशिवाय महागाई आणि राहणीमान खर्चासह इतर खर्चही वाढले आहेत. 


निळ्या-सिल्व्हर 'कूल' कॅब टॅक्सीचं भाडं किमान अंतरासाठी 30 रुपयांवरून 40 रुपये प्रति किलोमीटर करण्यात आलं आहे. त्यानंतर 26.71 रुपये प्रति किलोमीटर भरावं लागणार आहेत. एमएमआरटीएनं नवीन दरांनुसार, मीटरमध्ये नव्या दरांनुसार बदल करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे.