मुंबई :  ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असं एकेकाळी म्हटलं जायचं. मात्र, आता सोळाव्या वर्षाआधीच तरुणाई धोक्याच्या वळणावर येऊन ठेपली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत झालेल्या गर्भपातांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षात 15 वर्षांखालील गरोदर मुलींच्या गर्भपातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.


 

15 वर्षांखालील गर्भपातांच्या संख्येत 144 टक्क्यांनी वाढ झाल्याचं माहिती अधिकाराद्वारे उघड झालं आहे. 2011 या वर्षात 15 वर्षांखालील मुलींच्या गर्भपाताची संख्या 111 एवढी होती. 2012 मध्ये या वयोगटातल्या मुलींमध्ये गर्भपातांचं प्रमाण 185 पर्यंत वाढलं. तर, 2015 मध्ये ही संख्या 271 वर पोहचली आहे.
गेल्या वर्षभरात मुंबईत एकूण 34 हजार गर्भपात झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. गर्भपाताच्या वाढत्या टक्केवारीमुळे डॉक्टर आणि समाजशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

लैंगिक आकर्षण, त्याबाबत असणारं अज्ञान आणि लैंगिक शोषण यातून अल्पवयीन मुली गरोदर राहत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. 2014-15 या वर्षात मुंबईत 31 हजार महिलांनी गर्भपात केला. त्यापैकी सहा हजार केसेस एकट्या अंधेरीतील होत्या. खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्भपात करून घेणाऱ्या मुलींची संख्या यापेक्षाही जास्त असू शकते. त्यामुळे हा आकडा अधिक असल्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.