नवी मुंबई : विमानतळाच्या कामात ब्लास्टिंग करताना झालेल्या हलगर्जीपणामुळे 8 जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, या सर्व गोष्टींकडे सिडकोचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून, डोंगर फोडण्यासाठी ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आज दुपारी केलेल्या ब्लास्टिंगची तीव्रता जास्त असल्याने यात सिडकोचे 5 इंजिनियर आणि 3 कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत.

ब्लास्टिंगमुळे शेजारील घरांवर दगडं जाऊन पडल्याने गावकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. सिडकोच्या हलगर्जीपणामुळे आपला बळी जाण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

2019 पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान टेक ऑफ करणे हे राज्य सरकार आणि सिडकोचे ध्येय असल्याने युद्ध पातळीवर विमानतळाचे काम हाती घेण्यात आले आहे. पनवेल आणि उलवेमधील डोंगर भागात विमानतळ उभारले जात आहे. या ठिकाणी असलेल्या डोंगरांचा अडथळा निर्माण होत असल्याने ते पूर्णपणे कापण्यास सिडकोने सुरुवात केली आहे.

डोंगर फोडण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे. आज दुपारी करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे सिडकोचे 5 इंजिनियर आणि 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर ब्लास्टिंगची तीव्रता मोठी असल्याने आजूबाजूच्या घरावर जावून मोठं मोठे दगड पडलेले आहेत. घरावर दगडांचा मारा झाल्याने पत्रे फुटले आहेत. विटांच्या भिंती फोडून दगड घरात जाऊन पडले आहेत. यामुळे काही गावकऱ्यांनाही यामुळे जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, या डोंगराच्या आजूबाजूला 6 गावे आहेत. या गावांना मोबदला देऊन सिडको त्यांना इतर ठिकाणी हलवणार आहे. मात्र सिडकोने  शब्द देऊनही ग्रामस्थांचे अद्याप पुनर्वसन न केल्याने या ब्लास्टिंगमध्ये जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना रहावे लागत आहे.