मुंबई: साल 2018 मधील नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊतला ( Vaibhav Raut )  मुंबई उच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला आहे. पाच वर्षांपूर्वी एटीएसनं (ATS) वैभव राऊतला नालासोपारा येथून अटक केली होती. वैभव राऊत या सनातन संस्थेच्या साधकाच्या नालासोपाऱ्यातील घरातून एटीएसनं स्फोटक पदार्थ जप्त केले होती. हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणून दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप याप्रकरणी वैभवसह इतर आरोपींवर लावण्यात आला होता. 


जानेवारी 2023 मध्ये वैभव राऊतनं मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणातील अनेक सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणातील खटला सध्या सुरू असून तो लवकर संपण्याची काहीही शक्यता नाही. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती वैभव राऊतनं आपल्या जामीन अर्जात केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. कोर्टानं ही याचिका स्वीकारत जामीन मंजूर करताना वैभव राऊतला खटल्याच्या सुनावणीस नियमित हजेरी आणि साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश दिले आहेत.


वैभव राऊतच्या घरातून 20 जिवंत गावठी बॉंम्ब, 2 जिलेटिन कांड्या, 4 इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, 22 नॉन ईलेक्ट्रिक डिटोनेटर्स, POISON लिहिलेल्या एक लिटरच्या दोन बाटल्या तसेच वेगवेगळ्या स्फोटक पावडरची पाकिट एटीएसला सापडली होती. 


नालासोपारा शस्त्रसाठी प्रकरणी तपासयंत्रणेनं डिसेंबर 2018 मध्ये 6 हजार 842 पानांचं पहिलं दोषारोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात सादर केलं होतं. ज्यात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांगरकर, अविनाश पवार यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश होता. हे सर्वजण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित होते. यासर्वांवर युएपीेेए, शस्त्रसाठा प्रतिबंधक कायदा, विस्फोटक पदार्थ कायदा आणि आयपीसीच्या गंभीर कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत.


काय आहे प्रकरण? 


नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी अवैद्य शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना अटक करण्यात आली होती. त्या नंतर दहशतवाद विरोधी पथकानं या प्रकरणात चौथा आरोपी म्हणून जालना येथून श्रीकांत पांगरकरला अटक केली होती. हिंदु दहशतवाद पसरवत असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या या आरोपींना या संपूर्ण प्रकरणाच्या गंभीरतेची कल्पना होती. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा आणि इतर साहित्य हे या प्रकरणी अधिक खोलात तपास करण्याची गरज असल्याचं त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयानं मान्य केलं होतं.


आरोपींकडून मिळालेल्या माहीतीनुसार एटीएसनं नालासोपारा, पुणे आणि सोलापूर इथं छापेमारी केली होती. त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून गावठी पिस्तुलं, गोळ्या इत्यादी शस्त्रसाठी जप्त करण्यात आला. प्रसाद देशपांडे नाव्याच्या व्यक्तीकडून या गोष्टी हस्तगत केल्या होत्या. तसेच पुण्यातील पर्वती इथून काही सीसीटिव्ही फुटेज, तीन वाहनांच्या नंबर प्लेट्स आणि सुधन्वा गोंधळेकरच्या ऑफिसमधून काही आक्षेपार्ह लिखाण साहित्यही हस्तगत करण्यात आलं होतं. 


या प्रकरणात जप्त केलेलं एकूण साहित्य 


23 जिवंत गावठी बॉंब, 15 पिस्तुल, 1 बॅरल, 6 पिस्तुल मॅग्झीन, 3 अर्धवट पिस्तुल मॅग्झीन, 7 पिस्तुल स्लाईड, 41 जिवंत काडतुसं, गावठी बाॅम्ब, मेमरी कार्ड्स, 8 मोटार वाहनांच्या नंबर प्लेट्स, ‘क्षात्रधर्म साधना’ पुस्तकाच्या प्रती, 
डाय-या तसंच पुणे, नालासोपारा-ठाणे, सातारा, कोवाड-कोल्हापूर, बीड इथून 2 मोटार कार, 5 मोटार सायकल आणि मोटार सायकलचे तोडून वेगळे केलेले भागही जप्त करण्यात आले होते. 


ही बातमी वाचा: