मुंबई : महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)च्या या प्रस्तावाला नुकतीच परवानगी दिली आहे. या प्रस्तावात वाशी पुलाच्या टोलनाक्याजवळ प्रस्तावित असलेल्या निर्माणाधीन तिसऱ्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 137 झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष 26 झाडे तोडण्यात येणार असून 101 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत.


वाशी पुलाजवळील तिसऱ्या पुलामुळे सध्याच्या वाशी टोलनाक्यावरील होणारी वाहतूक कोंडीही फुटण्याची शक्यता असून या पुलामुळे मुंबई ते पनवेल दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे. सध्या वाशी खाडीवर दोन पुल सुरू आहेत. यातील जुन्या पुलावरून केवळ लहान वाहनांचा प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर नव्या पुलावरुन लहान आणि अवजड अशा दोन्ही वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तिसऱ्या पुलाच्या उभारणीमुळे वाहतूक कोंडी फुटेल असा अंदाज आहे. एमएमआरडीच्या मते, वाशी खाडीच्या दोन्ही बाजूला सुमारे 442 वृक्ष असून, यातील 281 झाडांवर कुऱ्हाड चालविण्याची परवानी नवी मुंबई महापालिकेने यापूर्वीच दिली होती. परंतु, मानखुर्द परिसरात आणखी 137 झाडे कापण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव प्रलंबित होता. ही परवानगी आता देण्यात आली आहे.

प्रत्यक्षात 26 झाडे कापली जाणार -
137 झाडांपैकी प्रत्यक्षात 26 झाडे कापली जाणार असून, 101 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. तर 10 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यापासून त्यांचा बचाव केल्याचेही एमएमआरडीएच्या वतीने स्पष्ट केले. कापण्यात येणाऱ्या झाडांमध्ये जास्तीत जास्त गुलमोहर आणि बोराची झाडे आहेत. त्यामुळे ही झाडे कापल्यानंतर खोड, बुंधा आणि फांद्या कापून त्यांना लगेचच अन्यत्र हलविले जाणार आहे. तीस दिवसांच्या आत हे काम पूर्ण केले जाईल असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील अडीच हजारच्यावर झाडे तोडल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ठाकरे सरकार सत्येत आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यामुळेच वाशी खाडीतील पुलासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांवरुन वाद होऊ नये म्हणून पालिकेने तयारी केली आहे.

Nitin Gadkari | विकासकामासाठी काही वेळा वृक्षतोड अनिवार्य : नितीन गडकरी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha