पुणे : मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. 14 मे रोजीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला.


केरळात मान्सून आलाय ते कसं कळतं ?

( मान्सूनच्या आगमनाची वर्दी अशी मिळते...) (मान्सूनच्या आगमनाचे निकष..)

निकष पहिला -

पाऊस (RAINFALL) – केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर 14 केंद्र आहेत, त्यातल्या 60 टक्के म्हणजे 8 ते 9 केंद्रावर सलग दोन दिवस किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस 2.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनची वर्दी समजली जाते, दुसऱ्या दिवशी हवामान विभाग मान्सून भारतभूमीवर आला अशी घोषणा करतं, मात्र त्यासाठी आणखी दोन निकष पाहिले जातात.

निकष दुसरा -

वाऱ्याचं क्षेत्र (WIND FIELD) – पश्चिमी वारे ठराविक वेगाने (ताशी 25 ते 35 किलोमीटर) आणि ठराविक दाबाने (600 हेक्टोपास्कल) वाहत असेल तर मान्सूनच्या आगमनाला पुष्टी मिळते

निकष तिसरा -

बहिर्गामी दीर्घतरंग प्रारण अर्थात Outgoing Longwave Radiation (OLR) – थोडक्यात उपग्रहांच्या आधारे त्या ठिकाणी ठराविक उर्जा – उष्णता आहे हे कळणं महत्वाचं. म्हणजे पावसासोबत वारे आणि त्या भागातील उर्जेची स्थिती हे तिनही निकष जुळून आले तरच मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते.

यासोबतच मान्सूनच्या प्रगतीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे मान्सूनची उत्तरी सीमा (Northern Limit of Monsoon (NLM) http://www.imd.gov.in/section/nhac/dynamic/Monsoon_frame.htm)

केरळात 1 जूनला आलेला मान्सून देशाच्या उत्तरेच्या बाजुने कसा पुढे सरकतो यावर त्याची प्रगती ठरते, मान्सूनचा पुर्वेकडील भाग ज्यावेळी ईशान्य भारतातच असतो त्यावेळी म्हणजे 10 जूनपर्यंत मान्सूनची उत्तरी सीमा पाऊस घेऊन मुंबईत पोहोचलेली असते, दिल्लीत साधारण 29 जूनला पोहोचलेल्या मान्सूनचा वेग मंदावतो आणि पश्चिम राजस्थानपर्यंत पोहोचायला मान्सून तब्बल 12 दिवस घेतो.

1 जूनला केरळात दाखल झालेल्या मान्सूनने 15 जुलैपर्यंत सर्व देश व्यापून टाकलेला असतो.

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस : आयएमडी

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने 18 एप्रिल रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला होता.

अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं होतं.

सरासरी पाऊस म्हणजे किती?

887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.

गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.

देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं.

2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.

संबंधित बातम्या :

आनंदाची बातमी! मान्सून अंदमानमध्ये दाखल


यंदा देशात 100 टक्के पाऊस, चांगल्या पावसाच्या अंदाजानं शेअर बाजार तेजीत


देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस : आयएमडी


यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज


मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं


अल निनोचा यंदा ‘मान्सून’वर फारसा परिणाम नाही: हवामान विभाग


अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!