Women Transforming India : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यातील 11 महिलांचा दिल्ली दरबारी सन्मान करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात उतुंग कार्य करणाऱ्या महिलांना 'भारत बदलणाऱ्या महिला' (Women Transforming India) या पुरस्कारानं निती आयोगातर्फे सन्मानित करण्यात आलं. देशातील एकूण 75 महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आलं, यामध्ये महाराष्ट्राच्या 11 महिलांचा समावेश आहे.  निती आयोगच्यावतीने भारत बदलणाऱ्या महिला या 5 व्या पुरस्कार सोहळयाचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं.


यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळं विविध क्षेत्राातील प्रशसंनीय कार्य करणाऱ्या  75 महिलांना गौरविण्यात आलं आहे. याप्रसंगी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सल्लागार अण्णा राय तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वरुप मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले. भारत बदलणाऱ्या महिला या पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध महिलांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये  माजी पोलीस महासंचालक तथा पुदुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी, माजी सहायक महासचिव संयुक्त राष्ट्र लक्ष्मी पुरी, डीआरडीओच्या एरोनॉटीकल सिस्टमच्या महासंचालक डॉ. टेसी थॉमस, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्ष अरूंदती भट्टाचार्य, नॅसकॉमच्या अध्यक्षा देबजानी घोष, अभिनेत्री आणि लोक गायीका  इला अरुण, यासह ट्रॅक आणि फिल्ड ऍथलीट शायनी विल्सन, टोक्यो ऑलिम्पिक  विजेती मुष्ठियोध्दा लवलीना बोरगोहेन, जागतिक प्रथम क्रमांची पॅरा बॅडमिटंनपटू मानसी जोशी, टोक्यो ऑलिम्पियन जिम्नॅस्ट प्रणीती नायक, मुष्ठियोध्दा सिमरनजित  कौर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं.




 
महाराष्ट्रातील या महिलांना पुरस्कार


मुंबईच्या डॉ. अर्पणा हेगडे यांनाही भारत बदलणाऱ्या महिला या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.  या अरमान नावाने गैरशासकीय संस्था चालवितात. या संस्थेच्यावतीने गर्भवती माता, नवजात अर्भक आणि पाच वर्षापर्यंतच्या बालकांची काळजी घेतली जाते. आतापर्यंत 27 लाख माहिला आणि बालकांना त्यांनी आवश्यक ती मदत पुरविली आहे. ही संस्था 19 राज्यात काम करते. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या किलकारी आणि मोबाईल अकादमी या प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबाजवणी अरमानच्या माध्यमातून केली जाते. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.


नागपूर जिल्ह्यात क्रांती ज्योती महिला बचत गट (रुलर मार्ट) चालविणाऱ्या दिपा चौरे आहेत. यांच्या बचत गटाच्या माध्यमातून  ग्रामीण भागात उच्च गुणवत्तेचं उत्पादन तयार केली जातात. त्यांनी 350 ते 500 महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.  




माणदेशी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकरीत्या सक्षम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनाही सन्मानित करण्यात आलं आहे. या बँकेचे लक्ष्य वर्ष 2024 पर्यंत 10 लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे आहे.


मुंबईतील रीसिटी नेटवर्क प्रा. ली. च्या मेहा लाहीरी या स्वच्छता या विषयावर काम करतात. प्लास्टिक कचरा हे आजचे आव्हान असून त्याशी निगडीत काम करणाऱ्या कामगारांचे समुपदेशन, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात. संस्था स्थापनेपासून  69 टक्क्यांपेक्षा जास्त महिला कचरा कामगारांवर संस्थेनं केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना भारत बदलणाऱ्या महिला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.


पुणे येथील स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या प्रेमा गोपालन यांनाही सन्मानित करण्यात आले. त्या पुरस्कार स्वीकारायला येऊ शकल्या नाहीत पंरतू, त्यांच्या संस्थेच्या प्रतिनिधीने हा पुरस्कार स्वीकारला.  त्यांनी संस्थेच्या माध्यातून बदलत्या नैसर्गिक वातावरणानूसार ग्रामीण भागात महिलांना शेती करण्याचे प्रशिक्षण दिले.  त्यांची संस्था महाराष्ट्र, केरळ, बिहार, ऊडीसा या राज्यांतही काम करते.  त्यापर्यंत त्यांनी  1 लाख 50,000 ग्रामीण महिला शेतकऱ्यांना  प्रशिक्ष‍ित केलं आहे.




पुण्यातील आदया ओरीजनल्स प्रा. ली. संस्थेच्या सायली मराठे यांना त्यांच्या ऐतिहास‍िकपणा जपणाऱ्या  चांदीच्या दागीने बनविण्याच्या कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 


मुंबईच्या शांती राघवन या अनऐबल  इंडिया गैरेशासकीय संस्थेच्यामाध्यमातून  दिव्यांगासाठी मागच्या 2 दशकांपासून काम करतात. देश घडविण्यात दिव्यांगाची महत्वाची भुमिका आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या करातून नवनवीन प्रकल्प उभारले जातात. दिव्यांगाचे अस्तित्व इतरांप्रमाणेचं महत्वाचे असल्याचे अधोरेखित त्या करीत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांनाही भारत बदलणाऱ्या महिला या पुरस्कारानं सन्‍मानित करण्यात आलं.




मुंबईतील टिच फॉर इंडिया आणि द आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून शाहीन मिस्त्री या वर्ष 2008 पासून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी काम करीत आहेत.  आजपर्यंत या संस्थेने 32,000 मुलांना टिच फॉर इंडियाच्या माध्यमातून शिक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे  33 दक्षलक्ष बालकांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र त्या उपस्थित राहू शकल्या नाही.


पुण्याच्या सुलज्जा मोटवानी यांनी  प्रदुषण नियंत्रण आणि पर्यावरण सरंक्षण व्हावे यासाठी  काइनेटिक ग्रीन एनर्जी ऍण्ड पावर सोलुश्यन या कपंनीच्या माध्यातून प्रदुषण कमी करणारे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरात असणारे वाहन तयार केले. या वाहनाची किंमतही परवडण्यासारखी ठेवली.  त्यांचा लाभ लोकांना होत आहे. यामाध्यमातून आतापर्यंत 50 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. 




मुंबईच्या फुट डॉक्टर पायांची न‍िगा कशी राखायची बद्दलची माहिती कलर मी मॅड प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून त्रिशला सुराणा देत असतात. यांना आणि मुंबईच्याच ओखई या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कारागींराना रोजगार देणाऱ्या किर्ती पुनिया यांनाही सन्मानित करण्यात आलं.