यवतमाळ : शिवसेनेने विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरु केलं आहे. मात्र, यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या मागील सहा महिन्यांपासून मतदारसंघात फिरकल्या नाहीत. नागरिकांनी कोणाकडे आपल्या अडचणी मांडायच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच शिवसंपर्क अभियानापासूनही त्या दूर आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे बॅनर शहरातील एलआयसी चौकात लावण्यात आले. 


आपण सुरु केले शिवसंपर्क अभियान या निमित्ताने का होईना आम्हा मिळेल खासदारांच्या दर्शनाचा मान !! 
एरव्ही त्यांचे आम्हास झाले दुर्लभ दर्शन: 
कंत्राटदार अन् कारखानदारीत रमले त्यांचे मन! 
असे अभियान आपण बारमाही ध्याना! 
अडीअडचणी आम्ही मांडायच्या कुणाकडे? 
समजून घ्या आमची भावना ! 
युगपुरुष मोदीचे करण्या हात बळकट; 
आम्ही यांना दिला होता मतरूपी आशीर्वाद! 
खासदार हरविल्या आमच्या 
कुठे मागायची आम्ही दाद


असा मजकूर असलेले बॅनर लावून खासदार भावना गवळी यांना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्याचं भाजपकडून जाहीर करण्यात आलं आहे.


ईडीच्या समन्सनंतर भावना गवळी सार्वजनिक पटलावरुन दूर


मनी लाँड्रिंग, विविध संस्थांमधील घोटाळ्यांच्या संबंधित कागदपत्रे आणि पुरावे, हरीश सारडा नामक त्यांच्या विरोधकाने ईडीला सुपूर्त केले. त्यानंतर वाशिमसह इतर काही ठिकाणी धाडीही पडल्या. त्यातच त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने 27 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईतून अटक केली आणि भावना गवळींचे आयुष्य बदललं.


ईडीचे समन्स आल्यापासून खासदार भावना गवळी अचानक सार्वजनिक पटलावरुन दूर झाल्यासारखा झाल्या. आपल्या मतदारसंघात खुल्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना भेटल्या तो दिवस म्हणजे 27 सप्टेंबर 2021. त्यानंतर तीन-चार दिवसांतच भावना गवळींना ईडीचे पहिले समन आले. 


आतापर्यंत ईडीने चार वेळा भावना गवळींना समन्स जारी केले आहेत, मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्या अजून एकदाही ईडीला सामोरे गेल्या नाहीत. पहिले त्यांची तब्येत खराब असल्याचे त्यांनी कळवले, त्यांना चिकन गुनिया झाला होता तर नंतर संसदेचे सत्र सुरु असल्यामुळे त्या ईडीसमोर उपस्थित झाल्या नाहीत. अनिल देशमुख यांच्याप्रमाणे आप ही ईडीसमोर गेल्यास अटक होईल का याची टांगती तलवार आहेच.


जाहीर कार्यक्रम जरी त्या घेत नसल्या तरी संसदेत त्या आताही येतात, मात्र फारशा सक्रिय दिसत नाहीत. एकीकडे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार हे त्यांनीच जरी उद्धव ठाकरेंना कळवले असले, तरी दुसरीकडे काही महिने आधी अत्यंत नाराजीने कंत्राटदारांना  गवळी काम करु देत नसल्याची तक्रार त्यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना केली होती. त्यामुळे ही ठाकरेंची त्यांच्यावर नाराजी असल्याचे कळते आणि त्यात ईडीने भर घातली. 


भावना गवळी यांची राजकीय कारकीर्द


खासदार भावना गवळी (जन्म - 23 मे 1973)


- खासदार भावना गवळी वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या आहेत. 


- शिवसेनेच्या भावना गवळी यांनी 1999 मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून वयाच्या 25 वर्षी पहिल्या निवडणुकीतच विजयी झाल्या. काँग्रेसचे अनंतराव देशमुख यांचा पराभव केला होता.


- 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक या यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराण्यातील दिग्गज नेत्याला हरवत दुसऱ्यांदा विजय साजरा केला.


- 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर यवतमाळ आणि वाशिम असा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. यात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस विधानसभा आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम विधानसभा अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला. 


- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा पराभव करुन 56 हजार 951 मताधिक्याने विजय मिळवला होता.


- 2014 च्या निवडणुकीतकाँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा 93 हजार 816 मतांनी पराभव केला. 


- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना 1 लाख 17 हजार मतांनी पराभूत केलं.