Ramesh Bais Maharashtra New Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. राष्ट्रपतींनी रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत.  महाराष्ट्रासह 13 राज्यांना नवीन राज्यपाल मिळाले आहेत. रमेश बैस झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये झाला. त्यांनी भोपाळमध्ये पीएससीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी शेतीही केली. 


रमेश बैस यांचा जन्म मध्यप्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे.  रमेश बैस यांना जुलै 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी जुलै 2019 ते 2021 पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.


रमेश बैस यांनी नगरपालिकेतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली होती. 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते.  त्यानंतर 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.  पण 1985 मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर 1989 मध्ये रायपूर येथील लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार राहिले आहेत. रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बैस यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. वाजपेयी सरकारच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात बैस यांनी पोलाद, खाणी, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण या विभागाचा कार्यभार सांभाळला आहे. 


2019 मध्ये तिकिट नाकारले 


2019 निवडणुकीमध्ये भाजपने रमेश बैस यांना तिकिट नाकारले होते. त्यानंतर त्यांची नाराजी समोर आली होती. त्यानंतरही त्यांनी भाजपचा प्रचार केला होता. याचं फळही त्यांना लगेच मिळालं होतं. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर बैस यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  


भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत विरोधक आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संताप 


महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी पहिल्या दिवसांपासून चर्चेत होते. त्यांनी मराठीतून शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यापर्यंत त्यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. राज्यात त्यांच्याबद्दल विरोधक आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संताप होता. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती. अनेक ठिकाणी विरोधकांनी आंदोलन आणि मोर्चे देखील काढले होते. त्यानंतर  भाजपची गोची होत असल्यानं राज्यपालांवर कारवाई होईल अशी चर्चाही गेल्या अनेक महिन्यांपासून होती. त्यात अखेर साडेतीन वर्षांनी कोश्यारींना राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त केले गेले आहे. त्यामुळं विरोधकांकडून निर्णयाचे स्वागत केले जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Bhagat Singh Koshyari : अखेर कोश्यारींची उचलबांगडी! 3 वर्ष, 5 महिने आणि 12 दिवसांचा प्रवास संपला