Mahadaji Shinde : मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे महादजी शिंदे. एक पराक्रमी योद्धा म्हणून महादजी शिंदे यांची इतिहासात ओळख आहे. मराठ्यांनी  पानीपतच्या पराभवाचा कलंक दिल्ली काबीज करुन 10 वर्षांनी पुसला. 1761 ला मराठ्यांचा पानीपतच्या युद्धात पराभव झाला होता. अखेर 10 वर्षांनी म्हणजे 1771 ला मराठ्यांनी त्या पराभवाचा वचपा काढत दिल्लीत भगवा फडकवला होता. या घटनेला आज 251 वर्ष पूर्ण होत आहेत. या पराक्रमात महत्वाची कामगिरी महादजी शिंदे यांनी बजावली होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती  संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. नेमके महादजी शिंदे कोण होते, त्यांच्या पराक्रमाची गाथा काय होती, याबद्दलची माहिती...


महादजी शिंदे यांची कारकीर्द 


महादजी शिंदे यांचा जन्म 3 डिसेंबर 1730 ला झाला होता. त्यांना मराठा साम्राज्यातील एक मुत्सद्दी योद्धा म्हणून ओळखले जात होते. महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. 1740 च्या निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. 1742 मध्ये बेळूरच्या लढाईत महादजी यांनी भाग घेतला होता. या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.


1745 ते 1761 हा मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास 50 लढायांचे नेतृत्व केले होते. मालव, राजपुताना, बुंदेलखंड (1747) मारवाड (1747) व हिम्मतनगर (1748) ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत महादजी शिंदे यांचा हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजी शिंदे यांच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज 1746, फतेहाबाद 1746, बडी साद्री या आहेत.
 
मल्हारराव होळकर यांच्या साथीने महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंदेंच्या अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी 1758 मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.


ग्वाल्हेरचे शासक


जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते. ते 25 जुलै 1755 ला राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले. त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारले गेले. तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. पानीपतच्या लढाईनंतर साहजीकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले. शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानीक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.


पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द


पानिपतच्या लढाईनंतर महत्त्वाचे होते ते म्हणजे मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे. नानासाहेब पेशव्यांच्या अकाली निधनानंतर 17 वर्षांच्या माधवराव पेशव्यांवर मराठी राज्याची जबाबदारी आली. अशा संकटसमयी माधवरावांनी धीरोदात्तपणाने महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या साह्याने मराठी साम्राज्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. इंग्रजांच्या नजरकैदेत असलेल्या शाह आलम बादशहाने माधवराव पेशवे आणि महादजींकडे संधान बांधून आपणास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्वीकारले व विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे यांच्याबरोबर पन्नास हजारांची फौज देऊन उत्तरेकडे महादजी व तुकोजींच्या मदतीस रवाना केली. आता महादजी व तुकोजींच्या नेतृत्वाखाली मराठे अब्दालीचा अफगाण हस्तक नजीबखानाच्या ताब्यातून दिल्ली मुक्त करण्याच्या कामगिरीवर निघाले. हे वर्तमान समजताच भयभीत झालेल्या नजीबखानाने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठविला. परंतु महादजींनी तो झिडकारला. मराठ्यांच्या भीतीने हाय खाऊन 31 ऑक्टोबर 1770 रोजी नजीबखान मरण पावला. नजीबखानाचा मुलगा झाबेदाखान याने दिल्लीचा ताबा घेतला होता. मराठ्यांच्या फौजा दिल्लीजवळ पोहोचल्या. 7  फेब्रुवारी 1771 रोजी महादजी शिंदे यांनी दिल्ली शहर जिंकून घेतले व दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला. झाबेदाखान व कासीम अलिखान याने काही काळ प्रतिकार केला; पण मराठ्यांच्या हल्ल्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि मराठ्यांनी त्यांना कैद केले. 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा दिल्लीवर फडकावला. 1777 मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते. यात महादजी यांनी निर्णायक कामगिरी केली होती. 1773 मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. त्यानंतर रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला. रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही. त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.


वडगावची लढाई


1777 मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचांना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतर दाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी 1779 मध्ये 3900 ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येऊन मिळाले. मराठ्यांचे सैन्य महादजी शिंदे आणि तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांची चाल थंडावली त्यानंतर त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे बंद करुन टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होऊ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले 12 जानेवारी 1779 रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.


16 जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने 1773 पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून 41000 रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले. त्यानुसार 18 जानेवारी 1779 रोजी रघुनाथराव व त्यांच्यांच सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यांची सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली.


सिप्री येथील हार


ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला. शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले. कर्नल गोडार्ड यांनी 6000 ची फौज फेब्रुवारी 1779 मध्ये घेऊन अहमदाबाद काबीज केले.  1780 मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी 1781 मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजींचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले. तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.


सालबाईचा तह 17 मे 1782


महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. हा तह  17 मे 1782 ला झाला होता. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली. इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच करून घेतला.


महादजी शिंदे यांना इंग्रजांकडून मानाने 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जाई. पानrपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला. इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले. श्रीगोंदा शहरात त्यांच्या नावावर महादजी शिंदे विद्यालय आहे.


या बातमीसाठी माहिती विकिपीडियावरुन साभार