Washim Accident News  : लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक झाल्याने वाशिमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता, की जागेवरच चार जणांचा मृत्यू झाला होता, एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. काही जणांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अकोला येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची पोलिसात तक्रार नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. हा अपघात इतका भीषण होता की, उभा असलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला होता. 


वाशिम तालुक्यातील सावंगा जहॉगिर येथील एक कुटुंब नागपूर येथून लग्न आटोपून येत होते. त्यावेळी मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेलुबाजार-वाशिम मार्गावर सोयता फाट्यानजिक चालकाचे नियंत्रण सुटले. सुसाट वेगात असलेली कार (एमएच 48, पी- 1445) रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यामुळे कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांची एकच गर्दी झाली. त्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरु झाले. पोलिसही घटनास्थळावर दाखल झाले. 


या अपघातामध्ये भारत गवळी (40), सम्राट भारत गवळी (12), पुनम भारत गवळी (37) आणि इतर दोन मिळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, एसटी सेवा बंद असल्यामुळे मेक्झिमो महिंद्रामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघात झालेल्या वाहनामध्ये दोन मुले, एक महिला बाकीची पुरुष मंडळी होती. हे सर्वजण नागपुरवरुन लग्न आटोपून आले होते. अपघातग्रस्त वाहनातून शेलूबाजार येथे उतरलेल्या महिलेनी सदर माहीती दिली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर कार उभ्या ट्रक्टरला धडकली, त्यानंतर हा अपघात झाला. यामध्ये पाज जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांवर उपचार सुरु आहेत. 


एकाच परिवारातील तीन जणांचा मृत्यू
वाशिम-शेलुबाजार मार्गावर घडलेल्या अपघातात जागेवर मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये एकाच परिवारातील पती, पत्नी आणि एका लहान मुलांसह तिघांचा समावेश होता. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


अपघाताची माहिती मिळताच साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य आदित्य इंगोले, ओम वानखडे, राहुल साखरे, नयन राठोड आणि ऋषिकेश येवले, तसेच पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाचे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे त्यांच्या पथकातील रुग्ण वाहिकेसी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोन १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. पोलीस अधीक्षक बच्चनसिंगही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते.