Washim News Update : जिल्हा   परिषदेच्या    बांधकाम  विभागामार्फत ग्रामीण भागात  मोठ्या  प्रमाणात नवीन रस्ते आणि   रस्त्यांचे  नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु, हे  रस्ते कंत्राटदाराच्या  फायद्यासाठी केले जात आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. वाशीम येथील  अनसिंग गावातील  उमराळा गावाला जोडणारा  रस्ता  अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार  केल्याची बाब समोर आली आहे. कारण तायर केलेला रस्ता अवघ्या 15 दिवसांत  उखडला आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी थातुरमातूर रस्ते तयार करून  जनतेच्या  पैशांची  लूट केली जात असून प्रशासनाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 


वाशीमधील अनसिंग ते उमराळा  या  गावाला जोडणाऱ्या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी वाशीम  जिल्हा  परिषदेने  57 लाख रुपये  मंजूर केले होते. परंतु, या रस्त्याचे काम सुरु असताना अंदाज पत्रक फलकही लावण्यात आला नव्हता. शिवाय 15 दिवसांत  रस्ता  तयार करून  आर्थिक वर्ष  संपण्यापूर्वी  बील काढण्याच्या  घाई  गरबडीत रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केल्याचा आरोप  पंचायत समिती सदस्य इम्रान कुरेशी  यांनी केला आहे.


रस्ता  निकृष्ट दर्जाचा होत असून यामध्ये मोठा  भ्रष्टाचार  होत असल्याचे दिसताच काम थांबवण्यास सांगितले. परंतु, कंत्राटदाराने रात्रीच रस्ता तयार केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.  


या संदर्भात  वाशीम  जिल्हा परिषदेच्या बांधकाम  विभागाच्या अधिकाऱ्यांकडून  माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकाऱ्यांसोबत संपर्क होऊ शकला नाही. परंतु, या रस्त्या संदर्भात तक्रार आली तर चौकशी करून कंत्राटदाराकडून रस्ता दुरूस्त करून घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकारी  डी. सी. खरोळे यांनी दिली.  


महत्वाच्या बातम्या