Wardha News Update : नियम धुडकावून कापूस बियाणांची विक्री करणाऱ्या वर्ध्यातील दोन कृषि केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. नियमांना फाटा देत वर्ध्यात कापूस बियाणांची विक्री होत असल्याचे कृषि विभागाच्या भरारी पथकाच्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे बियाणे विक्री करणाऱ्या दोन कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून सहा कृषि केंद्रांना दोन दिवसांत खुलासा सादर करण्यासाठी अवधी दिला आहे.


शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून 1 जूनपर्यंत कृषि केंद्राना कापूस बियाणे विक्री करण्यास मनाई आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु, हा मनाई आदेश डावलून या दुकानदारांनी कापूस बियाणांची विक्री केली. 


कापसावरील शेंदरी बोंडअळीचा जिवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडीत न झाल्याने पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव  वाढत आहे. हा अनुभव  लक्षात घेता खरीप हंगाम 2022 मध्ये शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालायचा असल्यास  शेंदरी बोंअळीचा जिवनक्रम खंडीत करण्यासाठी हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि केंद्राना  1 जूनपर्यंत कापूस बियाणे विक्री करु नये, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, असे आदेश असताना देखील दोन दुकानांनी कापूस बियांणांची विक्री केली. त्यामुळे त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. 


कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी अजयकुमार राऊत, मोहीम अधिकारी संजय बमनोटे, कृषि अधिकारी  मनोज नागपूरकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक परमेश्वर घातिडक यांनी ही कारवाई केली, अशी माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली आहे. 


दोषींवर होणार कडक कारवाई 
कृषि विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी वर्धा शहरातील आठ कृषि सेवा  केंद्रांची तपासणी केली. यावेळी मे.कोठारी  कृषि  सेवा केंद्र आणि मोहता मार्केट या कृषि केंद्रांतून कापूस बियाणे विक्री झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोन्ही दुकांनांचा बियाणे विक्री करण्याचा परवाणा पुढील 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. शिवाय मे चांडक ट्रेडर्स या कृषि  केंद्रामध्ये कागदपत्रांची अनियमितता आढळून आल्याने त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. तर मे राठी ट्रेडर्स, मे चांडक ॲग्रो सेंटर, अक्षय सिड्स,  मे चांडक ब्रदर्स, वानखेडे ॲग्रो सेंटर  व आदर्श ॲग्रो एजन्सी  या कृषि केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसांत खुलासा सादर करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.


वर्धा जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाव्दारे कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान अनियमितता आढळून आल्यास दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.