वर्धा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल विमानांच्या मुद्द्यावर पुन्हा हल्लाबोल चढवला. मोदी चौकीदार नाही, तर 'राफेल'मध्ये भागिदार आहेत, असं टीकास्त्र राहुल गांधींनी सोडलं. मोदींची गाडी पंक्चर झाली आहे, इंजिनही बिघडलं, आता काँग्रेसवर विश्वास ठेवा, असं आवाहन राहुल गांधींनी केलं.


'राफेल विमानांची किंमत 600 कोटींवरुन 1600 कोटींवर कशी गेली? मोदीजी, तुमचे मित्र अनिल अंबानीजी आहेत, ज्यांना तुम्ही राफेल विमानांचा करार दिलात, ज्यांच्या खिशात तुम्ही आपल्या देशातील माताभगिनींच्या खिशातले 30 हजार कोटी दिलेत, त्या अंबानींनी उभ्या आयुष्यात एकही विमान बनवलं नाही' असं राहुल गांधी म्हणाले.

'तुम्हाला मोदींनी लाईनमध्ये उभं केलं. माता-भगिनींनो, तुमचाच पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला मोदींनी रांगेत उभं केलं, मात्र तुम्हाला कधी सुटाबुटातला माणूस रांगेत उभा असल्याचं आठवतंय का? अंबानी, ललित मोदी, नीरव मोदी हे सगळे मोदींचे मित्र मागच्या दरवाजाने काळा पैसा पांढरा करत होते. हे चौकीदार नाहीत, तर राफेल घोटाळ्यात भागिदार आहेत' असा घणाघातही राहुल गांधींनी केला.

'15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचं भाषण सुरु होतं. भाषणात मोदी म्हणाले 'मी पंतप्रधान होण्यापूर्वी हत्ती झोपलेला होता. भारत निद्रावस्थेत होता.' हे भारताच्या पंतप्रधानांचे शब्द आहेत. आम्ही सगळे बसलो होतो. देशाचा पंतप्रधान कशी व्यक्ती आहे, याचा मी विचार करत होतो' असं राहुल गांधी म्हणाले.

'मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाचा अपमान केला. गांधीजींचा अपमान केला. देशाच्या जनतेचा अपमान केला. गांधीजी म्हणाले होते देशाला जोडायचं आहे, मोदी म्हणतात देशाला तोडायचं आहे' अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं? याबाबतही राहुल गांधींनी पुन्हा विचारणा केली. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन खोटं होतं.

'लोकसभेत चार प्रश्न विचारले. माझे डोळे बघा. मी डोळ्यात डोळे घालून बोलत आहे. मी मीडियाच्या कॅमेरात डोळे घालून बोलत आहे. कारण मी खरं बोलत आहे. पण मला उत्तर देताना पंतप्रधान इकडे तिकडे बघत होते. कधीच देशाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकले नाहीत.' असंही राहुल गांधी म्हणाले.