मुंबई : मराठा समाजाबाबतची भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) केला आहे. तर दुसरीकडे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी देखील वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले आहे.  एकटा तर एकटा लढा सुरू राहील, शेंडगे सारखे अनेक नेते माझ्या सोबत आहेत त्यांना घेऊन लढा सुरू राहणार असल्याचे  भुजबळांनी स्पष्ट केले आहे.


वडेट्टीवार म्हणाले, छगन भुजबळ टोकाची भूमिका घेत आहेत ते पाहता त्यामुळे मी यापुढे भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नाही. भुजबळांना विरोध किंवा समर्थनाचा प्रश्न नाही, त्यांनी टोकाची भूमिका घेतल्याने विरोध आहे. भुजबळांच्या भूमिकेमुळे समाजात तेढ वाढत आहे. त्याला आमचा विरोध आहे. महत्वाचं म्हणजे भुजबळांचं मत म्हणजे समाजाची भूमिका होत नाही. आपला हक्क मांडत असताना दोन समाजात तेढ निर्माण होईल याला माझा पाठिंबा नाही. समाजात दोन गट पडतील तर याला आमचा विरोध आहे, त्या भूमिकेला आमचं समर्थन नाही  भूमिका मांडताना  टोकाची भूमिका असू शकत नाही. समाजाच्या समस्या सोडवायच्या आहे.  गावागावात भांडण झाली तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे.  सत्तेत असलेल्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात मांडायच्या नसतात. 


मी कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही : भुजबळ


वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर भुजबळ म्हणाले, वडेट्टीवार यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, ते काय बोलले हे जाणून घेत आहे. 
माझ्या कोणत्या भूमिकेला त्यांचा विरोध आहे ते कळले नाही. एकटा तर एकटा लढा सुरू राहील, शेंडगेसारखे अनेक नेते माझ्या सोबत आहेत त्यांना घेऊन लढा सुरू राहणार आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण  देऊ नका ही भूमिका वडेट्टीवार यांची  होती. जे कुणबी आहेत त्यांबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. मी कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही. 


जरांगे वैयक्तिकरित्या मला टार्गेट करतात : भुजबळ


जरांगेंची सर्व भाषण माझ्याविरोधातील होती, अशी टीका भुजबळांनी केली आहे. दरम्यान जरांगे वैयक्तिकरित्या जर मला टार्गेट करत असेल तर त्यांना उत्तर देणारच  अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. मराठा समाजाविरोधात मी काही बोललो नाही. जरांगेंची भाषणे माझ्याविरोधात आहे. जाळपोळीसंदर्भात भाष्य करणं गरजेचं होतं. जरांगे किती वाईट बोलतात ते पण लोकांनी बघावे, असे देखील भुजबळ म्हणाले. 


जरांगेंच्या 14 सभांनंतर आमची एक सभा : भुजबळ


मनोज जरांगेंच्या 14 सभांनंतर आमची एक सभा झाली. आजही त्यांच्या दिवसाला दोन ते तीन सभा होत आहेत.  प्रत्येक आंदोलनाला वेळेत न्याय मिळतो असे नाही, मात्र आंदोलन सुरूच ठेवावं लागतं. अनेक लोकप्रतिनिधी कुणबी म्हणून निवडून आले आहेत. त्याबद्दल माझे काही मत नाही. जरांगे यांची नाशिकमधे सभा होत आहेत, त्यांना शुभेच्छा आहे, असे भुजबळ म्हणाले.


हे ही वाचा:


मराठा आरक्षणाच्या कालबद्ध कार्यक्रमावरुन मनोज जरांगे आक्रमक; आजच सरकारला शेवटचं विचारणार, जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा