नागपूर: विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीयांकडून करण्यात येत आहे. 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार उभा करणार आहे. तर अकरावा उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील अर्ज भरण्याची चिन्हं आहेत.


त्यामुळे 11 जागांसाठी अकराच उमेदवार रिंगणार उतरणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.  11 जागांसाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाचनंतर मतमोजणी होईल.

कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?

भाजपकडून यांची नावं जवळपास निश्चितभाई गिरकर, महादेव जानकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, उद्योजक मिलिंद कांबळे, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचा नातू)

शिवसेना - अनिल परब, मनिषा कायंदे

काँग्रेस - शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा

राष्ट्रवादी काँग्रेस - 

या सदस्यांचा कार्यकाळ संपणार

भाजपचे भाई गिरकर, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

एकूण 11 विधानपरिषद आमदार यावेळी निवृत्त होणार असून 27 जुलै 2018 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.

त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपचा एक, शिवसेना, रासप आणि शेकापच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.

राष्ट्रवादी मोठा पक्ष

सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्या खालोखाल काँग्रेसचं संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपा विधानपरिषदेत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र 16 जुलैच्या निवडणुकीनंतर भाजपा विधानपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार असल्यानं काँग्रेस सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे.