मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. अशातच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावं जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणं आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विधान परिषदेच्या या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती.


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. तर, भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे महाविकासआघाडीला पाच आणि भाजपला चार जागा मिळणार असून 21 मे रोजी पार पडणारी विधानसभेची निवडणूक बिनविरोधच पार पडणार अशी चिन्ह दिसून येत आहेत.


विधानपरिषद निवडणूक; भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळण्याची आशा


शिवसेनेकडून दोन उमेदवार म्हणजेच, उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अद्याप राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपमध्ये मात्र विधान परिषदेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या 'स्वकीय आणि परकीय' अशा दोन्ही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच केला जाणार आहे.


विधानपरिषद निवडणुकीसाठी आपण इच्छुक, पक्षश्रेष्ठींना कळवलंय : एकनाथ खडसे


निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर


विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी 21 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.


संबंधित बातम्या : 


महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, निवडणूक कार्यक्रम जाहीर


विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभागृह सदस्यत्वाचा पेच सुटणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा