Vidarbha Weather Update Akola : विदर्भात (Vidarbha) मान्सून दाखल होण्यास अद्याप अवकाश असताना विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटनाही आता समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना अकोला (Akola) जिल्ह्यात घडली. काल, 11 जून रोजी दुपारनंतर सुमारे दोन तास कोसळलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने एकच दाणादाण उडवली आहे.


दरम्यान यावेळी अकोल्यात (Akola News) विज पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यात वीज पडून या दोन तरुणाचा मृत्यू झालाय. ग्राम खापरवाडा येथील शुभम राजू टापरे (वय 30) आणि टिपटाळा येथील शालीग्राम श्रीराम डोंगरे (वय 65) असे मरण पावलेल्या व्यक्तींचे नाव आहे. दोघे जण शेतात काम करीत असताना त्यांच्यावर विजपडून काल सायंकाळच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झालाय. 


नदी नाल्यांना पूर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू


हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात दमदार मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने एकच दाणादाण उडवली आहे. काल 11 जूनच्या संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वारा आणि पावसाने विदर्भातील बहुतांश भागात मोठे नुकसान केल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. काल दिवसभर आणि रात्री अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे अकोट तालूक्यातील पठार नदीला पूर आलाय. मात्र, सध्या पठार नदीवर तीन ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या बांधकामाचा फटका नागरिकांना बसलाय. पठार नदीवर मरोडा, दिनोडा आणि पनोरी येथे पुलांचं बांधकाम सुरूये.


बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने तात्पुरता केलेल्या रस्त्याचा भराव तिन्ही ठिकाणी वाहून गेलाय. त्यामुळे तिन्ही गावातील दळणवळण व्यवस्था कोलमडून गेलीय. गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाचं बांधकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराच्या संथगतीने काम करण्याचा भुर्दंड या तिन्ही गावातील नागरिकांना भरावा लागतोये. या तिन्ही गावांचा संपर्क यामूळे सध्या तुटलाय. या तिन्ही ठिकाणच्या भराव वाहून गेल्याची एक्सक्लूझिव्ह दृष्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.


विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 


दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात 11 ते 16 जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये, वीज चमकत असताना मोबाईल, विजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने विजेचा खांब आणि झाडे यापासून दूर ठेवावीत, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या