Vidarbha Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. परिणामी आज शेतकऱ्यांचा सण असलेल्या बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी असल्याचे चित्र पुढे आले आहे. अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाच्या सक्रीयतेमुळं राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.


तर विदर्भ (Vidarbha Weather Update) मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.


बैल पोळा सणाला शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी


यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यातील 16 तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. यावर्षीच्या पावसाळ्यातील हा सर्वांत मोठा पाऊस मानला जात आहे. या पावसाने शेत शिवारातील पीक खरखून गेली आहे. तर जवळपास 200 घरांची पडझड झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांमध्ये 83 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक 129 मिमी पावसाची नोंद वणी तालुक्यात करण्यात आली. पुसद, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, घाटंजी, महागाव आणि उमरखेड तालुक्याला या पावसाचा सर्वधिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार साडेचार हजार हेक्टरचे नुकसान यात झाले असले तरी वास्तवात मात्र हेच नुकसान आठ ते दहा हजार हेक्टर वर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोळा या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल आहे. परिणामी, या परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल 


अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अकोलखेड गावात नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. अकोलखेड गावातील अनेक रस्त्यांवर नदीचे स्वरूप आले. दरम्यान, आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. त्यात सातपुडा पर्वतरांगामध्ये देखील संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अकोल्यातल्या सर्वच धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पोपटखेड धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळीत वाढ झाली. त्यामुळे आज दुपारपासूनच पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आलाय. 


परिणामी, नदीकाठच्या अकोलखेड गावात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. तर अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे अकोलखेड ग्रामस्थांचे रात्री हाल होत आहेत आणि गावकरी रस्त्यावर आले आहेत. ऐकूणच ग्रामस्थांचा प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान कालपासूनच संबंधित विभागानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला होता.


आजोबांचं नसतं धाडस चांगलेच अंगलट आलं!


दमदार पावसाचा फटका विदर्भातील वाशिम जिल्ह्याला देखील बसला आहे. यात एका वयोवृद्ध आजोबांचं धाडस चांगलेच अंगलट आलं आहे. पुलावरून पाणी वाहताना पूल पार करणे या आजोबांना महागात पडले आहे. आज कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला असून जयपूर - शहा गावाच्या लगत असलेल्या पुलावर पावसाच्या पुराचं पाणी वाहत असतांना एका वयोवृद्ध आजोबांनी नसतं धाडस केलंय. मात्र हे धाडस आजोबाच्या जीवावर बेतता बेतता राहीलंय. 


आजोबा पुलावर पाणी वाहताना वाहून जातांना दोन्ही बाजूला पुलावर उभ्या नागरिकांनी पाहिले आणि धावपळ करत अर्धा किलोमीटर दूर आजोबाला वाचवण्यात यश आलं.  तर पुलावर पाणी वाहताना अनेकांनी ट्रॅक्टरवर काही नागरिकांना बसवून  वाहत्या पुलाच्या पाण्यातून ट्रॅक्टर  चालवण्याचा धाडस केले. सुदैवाने कोणताच अनुचित प्रकार घडला नसला तरी. नसती उठाठेव का बरं नागरिक करतात असा प्रश्न उपस्थित होतांना दिसतोय.


हे ही वाचा