Vidarbha Unseasonal Rain : राज्यातील बहुतांश भागात आज अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावत दाणादान उडवली आहे.  दादर, मुलुंड, ठाणे, बदलापूर, घाटकोपरसह मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) एंट्री करत हाहाकार माजवला आहे. अवघे काही तास कोसळलेल्या या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई मेट्रो, लोकलसह वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र आहे.  काही ठिकाणी पत्रे उडून गेले तर वडाळा येथील पार्किंग टॉवर कोसळला आहे.


तसेच मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला तर कुठे भले मोठे होर्डिंग कोसळे असून त्याखाली काही वाहनांसह नागरिक अडकल्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्याच्या इतर भागात देखील या अवकाळी पावसाचा जोर बघयाला मिळत आहे. विदर्भात देखील आज दमदार पावसाने हजेरी लावली असून पुढील 4 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. 


हवामान विभागाचा'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी


राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक एंट्री केल्याने सर्वत्र एकच दाणादान उडाली आहे. तर त्याचा फटका हा शेतकऱ्यांना देखील बसतो आहे. अशातच विदर्भात सलग कोसळणाऱ्या या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावला आहे. अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही बसला आहे. तर आज 13 मे ते 16 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर आजपासून पुढील 16 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.


सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी 


विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सलग चौथ्या दिवशी विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात अनेक गावांना आज सोमवारी सकाळी अवकाळीचा फटका बसला आहे. सकाळी तब्बल 30 मिनिट पाऊस बरसलाय. सोबत विजेचा कडकडाट सुद्धा सुरू होता. आधीच अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने तेल्हारा तालुक्याला मोठा फटका बसला होता. तालुक्यातल्या हिवरखेड, कार्ला यासह अनेक गावांना फटखा बसला होता. यामध्ये केळी, पपई, आंबा, यासह इतर फळबाग आणि इतर पिके भुईसपाट झाल्या आहेत. अशातच आज परत आलेल्या अवकाळी पावसाने संकाटाचे ढग आणखी गडद होण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती विदर्भातील इतर ठिकाणची आहे.  


दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाची हजेरी 


हवामान विभागानं 15 मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पुन्हा एकदा भंडाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून उन्हाची प्रखरता जाणवू लागली  असता आज आलेल्या या पावसानं नागरिकांची होणाऱ्या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून त्याच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. मात्र पुन्हा अवकाळीचा जोर वाढत असल्याने आणखी नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.  


वीज कोसळून बैल जोडी ठार


यवतमाळच्या झरी तालुक्यातील मार्की (बु.) येथील दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची घटना समोर आली आहे. दिवाकर यांनी त्यांच्या शेत शिवारात वादळी वारा आणि पाऊस आल्याने झाडाचा आसरा घेण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या खाली आपल्या बैलला बांधून ठवले  होते.  दरम्यान, बांधून असलेल्या बैलावर वीज पडली आणि त्यात या दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या