मुंबई : ठाण्यानंतर आता दादर व मुंबईतही (Mumbai) वादळी वाऱ्याचे आगमन झाले असून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, वादळी सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई मेट्रोही (Metro) ठप्प झाल्याची माहिती आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणी परिसरातही सोसाट्याचा वारा सुटला होता. या वाऱ्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना आडोसा पाहिला, तर काहींनी आपले घर गाठले. मात्र, काही ठिकाणी पत्रे उडून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. 


मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वारं सुटलं असून हवामान ढगाळ झालं आहे. पुढील काही तासांत येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. टॅक्सी, ऑटो व वाहनचालकांनीही जागेवर थांबा केल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला. मात्र, तासाभरानंतर पुन्हा मुंबई मेट्रो सुरू झाली आहे.


मुंबई मेट्रो ठप्प


एअरपोर्ट रोड स्टेशनवरवर ही मेट्रो थांबली आहे, वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपर येथून वर्सोवा मार्गावर धावणारी ही मेट्रो जागेवर थांबली आहे. त्यामुळे, प्रवाशी खोळंबले असून एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच अडकून पडले आहेत.


विमानसेवेवरही परिणाम


विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले असून वेळेतही बदल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


लोकलसेवा विस्कळीत


मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे, लोकल सेवेच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली असून पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.  मध्य रेल्वेवर ठिकठिकाणी स्पार्क झाल्याने लोकल अनेक ठिकाणी थांबून थांबून पुढे जात आहेत. तर मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हर हेड वायारचा खांब कोसळल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक बंद आहे


दरम्यान, रायगड जिल्ह्यात मागील आठवड्यात आतापर्यंत तीन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकलं आहे. माणगाव तालुक्यातील लोनेर परीसरात आज दुपारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळीने आंबा बागायतदार मात्र शेवटच्या फेरीत राहिलेल्या आंबा काढण्यापासून पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. 


पुणे, रायगडसह अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज


पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) , हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर कल्याण, डोंबिवलीत धुळीसह जोरदार वारा वाहत असून काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. 


विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात ढगाळ वातावरण झालं असून जोरदार  वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.