Vasantdada Patil : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक निर्णायक वळण देणारे सहकारमहर्षी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांची आज (13 नोव्हेंबर) जयंती. 13 नोव्हेंबर 1917 साली पद्माळे या छोट्या गावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते आणि प्रभावी मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात राज्यासाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांच्या कामामुळं आजही जनमाणसात त्यांचे स्थान कायम आहे.


स्वातंत्र्यलढ्यात सहभाग 


सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी त्यांचा जन्म झाला आहे. अगदी लहान वयातही ते (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. 1940 पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला होता. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बाँबचा वापर करुन ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणं इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, 1942 मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत देखील झाले होते. त्यांना सुमारे तीन वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1943 मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्‍न केला असता, त्यांच्या खांद्याला गोळी लागली होती. त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चे या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्‍नांत रामानंद भारती, बॅरीस्टर नाथ पै देखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागात दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते.


1977 ते 1985 या काळात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं


वसंतदादांनी 1977  ते 1985 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 1977 ला ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एका वर्षानी त्यांचे सरकार पडून शरद पवार यांच्या नेतृत्वात पुलोदचे सरकार आलं होते. त्यानंतर 1983 ला वसंतदादा पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्याआधी 1972 मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे 25 वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात आणि वाढण्यात वसंतदादांचा मोठा आहे. 


मुख्यमंत्री पदाच्या काळात दादांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय


मुख्यमंत्री असताना वसंतदादांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्या निर्णयामुळे त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय म्हणजे, मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन, तसेच कृषी आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी चांगले निर्णय घेतले. विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये काढण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड बदल झाले. त्यांच्यावर शिक्षणाच्या खासगीकरणाचा ठपकाही ठेवण्यात आला, पण या सगळ्याला वसंतदादा यांनी समर्थपणे तोंड देत राज्यात बदल घडवून आणले. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यांत आढळतात.


सहकार क्षेत्राचा विकास आणि विस्तारात मोठं काम 


वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास आणि विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. 1956-57 मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वतःशेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळेच 1967 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. 


वसंतदादांनी भूषवलेली पदं


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (1965)
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (1970-72)
साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (1970-71) होते.
राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही  अध्यक्ष होते
माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (1967).
1969 साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले.
1971 मध्ये अमेरिकेतील लुइझिॲना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्‍ज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Vasantdada Patil : वसंतदादांच्या धाडसाला 79 वर्ष पूर्ण, पाहा तुरुंग फोडून कशी केली होती सुटका