वसई : मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कॉलेज तरुणांनी बाईकचोरी केल्याचा प्रकार वसई परिसरात समोर आला आहे. नालासोपारा आणि विरारमधील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांची बाईकचोरी उघड झाली आहे.


 

याप्रकरणी पोलिसांनी 5 संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. अटक झालेल्या 5 तरुणांमधील 4 जण अल्पवयीन आहेत. त्यांची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

 

या टोळीने तुळींज, विरार आणि भाईंदर परिसरात चोऱ्या केल्या असून पेट्रोल संपेपर्यंत ते गाडी चालवायचे. त्यानंतर दुसरी गाडी चोरायचे. त्यांच्याकडून 6 लाखांच्या दोन रिक्षा आणि 8 मोटरसायकल जप्त केल्या आहे. फक्त मुलींना इम्प्रेस करण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

 

केवळ कॉलेज तरुणच नाही तर पोलिसांनी सापडलेल्या चोरीच्या बाईक स्वत: किंवा मित्राला वापरण्यास दिल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी तुळींज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाने चोरीची मोटरसायकल आपल्या मित्राला चालवण्यास दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी चौकशीचे आदेशही दिले होते.