पंढरपूर : राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व 48 लोकसभा उमेदवार निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत, अशी माहिती वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.


लोकसभा निवडणूक मतमोजणीत अनेक ठिकाणी मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत फरक समोर आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने याची दाखल घेतली नाही.

यामुळे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील 'वंचित' चे उमेदवार येत्या आठ दिवसात मुंबई उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. मतमोजणीमध्ये बाहेर आलेल्या आकड्यांच्या तफावतीमुळे जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे. याचसाठी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला आठ दिवसात याचा खुलासा करण्याची मागणी केली होती .

मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशीनच्या वापराबाबत अनेक राजकीय पक्ष आक्षेप घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 17 जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसील कार्यालयाबाहेर  घंटानाद आंदोलन केले जाणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.

या लोकसभा निवडणुकीत जवळपास 350 मतदारसंघात आकडेवारीत तफावत समोर आल्याचा दावा पडळकर यांनी केला असून निवडणूक आयोग याला उत्तर देत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात याचिका दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.