बीड : तब्बल 19 महिन्याचे वेतन मिळाले नाही म्हणून दहा दिवसात वेतनाचा प्रश्न सोडवा, नाहीतर कारखाना बंद करू असा इशारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी दिला होता मात्र दहा दिवस संपल्यानंतर ही पेमेंट न मिळाल्याने अखेर कामगारांनी आज साखर कारखाना बंद ठेवत निषेध नोंदवला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये वेतनासाठी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 


मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यनाथ कारखान्यात धुडगूस घातल्याचा आरोप भाजपा कडून करण्यात आलाय. तब्बल दीड वर्ष वैधनाथ सहकारी साखर कारखाना बंद होता त्यानंतर मागच्या चार महिन्यांपासून साखर कारखाना सुरळीत सुरू झाला मात्र या दरम्यानचे वेतन हे कर्मचाऱ्याला मिळाले नाही असा आरोप करत आज कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले तर या कर्मचाऱ्यांना चालू काळातील वेतन देण्यात आले असल्याचे साखर कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येतेय. 


सावध व्हा! वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवलीत कठोर निर्बंध लागू 


दरम्यान, मागच्या चार पाच महिन्यापासून कारखाना सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स पेमेंट दिले असल्याचे साखर कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आलेय. 
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे काम बुधवारी कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या मागणीसाठी बंद ठेवले. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्मचाऱ्याकडून साखर कारखान्यामध्ये धुडगूस घालण्यात आला असल्याचा आरोप भाजप कडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात केला आहे.


...आणि कर्मचारी संतप्त झाले


सततच्या दुष्काळामुळे मागच्या काही वर्षांमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद ठेवावा लागला होता अगदी दीड वर्षे बंद ठेवल्यानंतर मागच्या चार पाच महिन्यापासून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू झाला मात्र साखर कारखाना बंद असताना त्या काळातील वेतन कर्मचाऱ्याला मिळाले नसल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते म्हणूनच आज कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कारखाना बंद केला असून त्यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.
आज कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही काळ साखर कारखाना परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता.


राष्ट्रवादीच्या कर्मचाऱ्यांनी साखर कारखान्यावर धुडगुस घातल्याचा भाजपचा आरोप


वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर भाजपने पत्र काढला आहे त्यात म्हटले आहे की. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी  मारामारी, गोंधळ करून अक्षरशः धुडगूस घातला. हा प्रकार म्हणजे चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या कामात खिळ घालण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार आहे असे कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे, व्यंकटराव कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी म्हटले आहे.