मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे तेलतुंबडे यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी आनंद तेलतुंबडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे तेलतुंबडे हे सध्या रुग्णालयात असून जेल प्रशासनाला 15 मे पर्यंत तेलतुंबडेंना देण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. आनंद तेलतुंबडे यांना जेलमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्याची मागणी गेल्या सुनावणीत करण्यात आली होती.


सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपताच तेलतुंबडे हे मुंबईतील एनआयए मुख्यालयात तपास यंत्रणेपुढे शरण आले होते. त्यानंतर एनआयएकडून त्यांना अटक करण्यात आली. तर माओवादी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले गौतम नवलखा हे दिल्लीत एनआयएपुढे शरण आले असून त्यांना तिथं अटक करण्यात आली आहे. गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे हे दोघेही एल्गार परिषदेशी संबंधित असून भीमा-कोरेगाव प्रकरणात यांच्या सहभागाबाबतही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याबाबत चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं आहे.


शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गाडलिंग, वरवरा राव यांच्यासह इतर आरोपींकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध जोडलेली अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. त्यात या आरोपींनी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध कसे ठेवले आहेत याचा उल्लेखही या कागदपत्रातून करण्यात आला असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. तसेच आनंद तेलतुंबडे हे प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून अशा संस्थांमध्ये लोकांची भरती करणे आणि या संस्थांसाठी निधी गोळा करण्याचे कामही ते पाहत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


संबंधित बातम्या :