Ujani Dam News : उजनी धरणात (Ujani Dam) मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. सध्या धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. धरण 86 टक्के भरलं असून, 80 हजार क्युसेक्सने धरणात पाण्याचा विसर्ग येत आहे. हा प्रवाह 1 लाखापर्यंत वाढणार असल्यानं आज सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून 20 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसार्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळं पंढरपूरसह (Pandharpur) नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पुराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. 


गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळानंतर यंदा उजनी धरण भरणार का? याची काळजी लागली आहे. आता उजनी तुडुंब भरु लागले असून, येणाऱ्या पाण्याची अवाक 1 लाख क्युसेक्सपर्यंत जाऊ लागल्यानं आता आज सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणातून 20 हजार क्युसेक्स विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. आज सकाळी उजनी धरणाने 90 टक्क्यांची पातळी गाठली असताना वरुन धरणाकडे येणाऱ्या पाण्याची अवाक 1 लाख क्युसेक्सपर्यंत पोहोचू लागल्याने धरण प्रशासनाने धरणातून सुरुवातीला 20 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढत राहिल्यास धरणातून सोडावा लागणार विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढवावा लागणार आहे.


वीर धरणातूनही नीरा नदीत 42 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात


एका बाजूला उजनी धारण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत 42 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येत असते. सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा नदी दुथडी भरुन वाहत असताना आता यात उजनी धरणाचे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपूरचा पुराचा धोका वाढणार आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात असाच पाऊस सुरु राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसणार आहे.


सोलापूरसह अहमदनगर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पाणीप्रश्न सुटणार 


सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण लवकरच 100 टक्के होणार असल्यानं आता सोलापूर जिल्ह्यासह, अहमदनगर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याच्या  शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. उजनी धरणाची एकूण क्षमता 117.23 TMC असून यात जिवंत साठ्यात 53.57 TMC तर मृत साठ्यात 63.66 TMC पाणी साठवता येते.  यावर्षी धरणाने नीचांकी पातळी गटात वजा 60 टक्के एवढी पातळी गाठली होती. मात्र, जुनापासूनच पुणे जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसाने आज 4 ऑगस्ट रोजी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. अजूनही उजनी पाणलोट क्षेत्रात 2 महिने पावसाचा कालावधी असताना ऑगस्ट मध्येच पुरस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.  उजनी धरणात पूर नियंत्रणासाठी 110 टक्के पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने 123 TMC पर्यंत पाणी धरणात साठवता येवू शकते. मात्र, सध्या ज्या प्रमाणात उजनी धरणात पाणी येऊ लागले आहे, हे पाहता प्रशासनाने आजपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


उजनीची शंभरीकडे वाटचाल, बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद, मागील वर्षीची सर्वोच्च पातळी ओलांडली